३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 09:31 IST2025-08-05T09:31:26+5:302025-08-05T09:31:42+5:30
१२ तासांनंतर पोलिस म्हणाले, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही, आंदोलक न्यायालयाकडे दाद मागणार

३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न'
पुणे : पोलिसांनी कोथरूड ठाण्यात तीन मुलींना जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर तब्बल १२ तासांपेक्षा जास्त वेळ घेऊन ही घटना वस्तुस्थितीवर आधारित नसून गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप आता आंदोलकांकडून होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून एक विवाहित तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली. मैत्रिणींच्या मदतीने कोथरूड येथे राहणाऱ्या तीन तरुणींच्या फ्लॅटमध्ये तिने आश्रय घेतला आणि काही काळाने निघूनही गेली. याच कारणामुळे, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पुण्यात येऊन कोथरूड पोलिसांच्या मदतीने वॉरंट नसतानाही मुलींच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्यांनी मुलींच्या सामानाची तपासणी केली आणि त्यांना कोथरूड पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत पाच तास बसवून ठेवले. या खोलीत त्यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात आला.
या प्रकरणाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी या मुलींसह रोहित पवार, सुजात आंबेडकर यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते रविवारी मध्यरात्रीनंतरही पोलिस आयुक्तालयाबाहेर ठाण मांडून बसले होते. आमदार पवार यांनी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांकडून लेखी देण्यात आले आहे.
‘तो’ साध्या वेशातील कोण?
कोथरूड येथील मुलींच्या फ्लॅटवर पोलिसांसोबत एक साध्या वेशातील व्यक्तीदेखील आली होती, अशी माहिती मुलींनी दिली. ती व्यक्ती कोण? महिला पोलिसांसोबतच संबंधित माजी पोलिस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या, पोलिस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत, या व्यक्ती पोलिस दलातील कुणाशी संबंधित आहेत? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.
पोलिसांचे म्हणणे काय?.
मुलीच्या तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी घडलेली घटना ही वस्तुस्थितीवर आधारित नसून यामध्ये तथ्य दिसून येत नाही. त्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नसल्याचे पत्र कोथरूड पोलिसांनी मुलींना दिले आहे. सोमवारी (दि. ४) पहाटे अडीचच्या सुमारास पोलिस आयुक्तालयात धरणे धरून बसलेल्या मुलींना कोथरूड पोलिसांनी हे पत्र दिले आहे. पहाटे २ वाजता या मुलींकडून तक्रार अर्ज घेण्यात आला. त्यानंतर पहाटे अडीच वाजता कोथरूड पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जाला उत्तर दिले. पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या पत्रानुसार तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी घडलेली घटना/घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथमदर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय संहिता/अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याचे दिसून येत आहे.
आयुक्तांकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी कोथरूडप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. पोलिस मुलींचा छळ करतात, त्यांचा विनयभंग करतात. त्यांना जातीवाचक शिव्या देतात; पण आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिस आयुक्तालयापासून सगळी पोलिस यंत्रणा ॲट्रॉसिटीची साधी तक्रारही घेत नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले.
पोलिसांवर दबाव कुणाचा?
कोथरूड पोलिसांनी तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केली. यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. यावेळी पोलिसांवर कुणाचा दबाव होता का, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडे कायदेशीर पत्रव्यवहार किंवा परवानगी घेतली होती का?
आज पुढील भूमिकेबाबत ठरणार.
पोलिसांकडे आमचे अजूनही ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून घ्यावा असे म्हणणे आहे. अन्यथा पुढील कायदेशीर बाबींसंदर्भात आम्ही चर्चा करत आहोत. न्यायालयात जाण्याची वेळ आली तर काय यासंदर्भात मार्गदर्शन घेत आहोत. मंगळवारी आम्ही पुढील भूमिका स्पष्ट करू.