Ganpatrao Deshmukh Death: "महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 23:58 IST2021-07-30T23:58:02+5:302021-07-30T23:58:50+5:30
Ganpatrao Deshmukh Death: महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला, अशा शब्दांत आपल्या शोक भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

Ganpatrao Deshmukh Death: "महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला"
मुंबई : गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहेच. शिवाय त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला, अशा शब्दांत आपल्या शोक भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला. विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली. तसेच, गणपतराव देशमुख यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व
सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी निधन झाले. विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला होता. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.