निष्ठावंताची अखेर..., गणपतराव देशमुख... राजकारणाची एक पिढी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 09:32 AM2021-07-31T09:32:01+5:302021-07-31T09:32:37+5:30

Ganapatrao Deshmukh: एकच झेंडा, एकच पक्ष आणि एक मतदारसंघ घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल ११ वेळा निवडून येऊन ५० वर्षे विधिमंडळात आपल्या राजकारणाने प्रभाव पाडणाऱ्या अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने निष्ठावंत राजकारणाची अखेर झाली.

The end of loyalty ..., Ganapatrao Deshmukh ... a generation of politics | निष्ठावंताची अखेर..., गणपतराव देशमुख... राजकारणाची एक पिढी

निष्ठावंताची अखेर..., गणपतराव देशमुख... राजकारणाची एक पिढी

Next

- समीर इनामदार
आमदार होण्याचं प्रत्येक राजकारण्याचं स्वप्न असतं. त्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. मात्र, आमदारांच्या वयाइतकी वर्षे विधानसभेत मांड ठोकून राहणं हे दिव्य नसून एक तपस्याच आहे. विधानसभेत ५० वर्षे काम करण्याचा अनुभव असणारे गणपतराव देशमुख हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण. 
गणपतरावांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल ११ वेळा विजय संपादन केला. एन. डी. पाटील यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तो त्यांच्या खिशातला (पॉकेटबरी) मतदारसंघ असल्याचं त्यांनी सिद्ध केलेे. नातवाने, वडिलांनी आणि आजोबांनी एकाच व्यक्तीला मतदान करणे ही एक अद्वितीय घटना आहे. ती गणपतराव देशमुख यांच्याच बाबतीत घडू शकते. असा नेता सापडणे दुर्लभ होते. बीए, एलएलबी पदवी मिळविल्यावर आपल्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी समाजाच्या ‘अ‍ॅडव्होकसी’साठी केला. अभ्यासू वृत्ती, चिकटपणा, घेतलेल्या कामाचा वसा टाकायचा नाही, ही ओळख. गोरगरीब शेतकरी त्यांच्याकडे कोर्टाच्या कामासाठी येत असत. त्यावेळी त्यांना त्यांच्यातील गरिबी, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा याचे दर्शन घडले. त्यातूनच राजकारणाचा प्रारंभ झाला. सुरुवातीला ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास प्रारंभ केला, त्याच पक्षाचा कार्यकर्ता म्हणून गेल्या ६० वर्षांनंतरही त्यांना काम करताना पाहता आले. शेतकरी कामगार पक्ष सोडून ते सत्ताधाऱ्यांच्या पक्षात राहिले असते तर कदाचित मोठ्या पदावर पोहोचले असते. मात्र, ज्या निष्ठेने आणि ध्येयाने ते राजकारणात आले, त्याच्याशी त्यांनी कधी प्रतारणा केली नाही.
१९६२ साली ते पहिल्यांदा सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. तत्पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. त्यानंतर १९७२ व १९९५ चा अपवाद वगळता या मतदारसंघावर गणपतराव देशमुख यांचेच वर्चस्व राहिले. इंग्रजांनी बांधलेल्या बुद्धेहाळ तलावात त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या. त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून गणपतरावांनी १९५८ साली लढा उभारला. त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना झाला. १८९४ सालचा इंग्रजांचा कायदा मोडून काढण्यासाठी त्यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावले.  
सांगोला, जत, आटपाडी, कवठे-महांकाळ, मंगळवेढा, माण हे परंपरेने दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. सांगोला तालुका माणदेशात मोजला जातो. दर तीन वर्षाला दुष्काळाचा तडाखा या तालुक्याने सोसला आहे. या तालुक्यात कोणताही उद्योगधंदा नव्हता. उपासमारी ही पाचवीला पुजलेली. अशावेळी तालुक्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच ध्येय त्यांनी समोर ठेवले. 
गणपतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. सातत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगोला तालुक्याचा कायापालट करण्यामागे गणपतरावांची भूमिका अग्रेसर राहिली. भौगोलिकदृष्ट्या खडकाळ, माळरानाचा भाग असलेल्या या तालुक्यात १९८० नंतर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बोर, डाळिंब फळबाग लागवडीचा कार्यक्रम प्रामुख्याने राबविला. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने क्रांती आणण्याचे काम त्यांनी केले. १९६२-६७, १९६७-७२, १९७४-७८, १९७८-८०, १९८०-८५, १९८५-९०, १९९०-९५, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४ आणि २०१४-१९ या काळात ते निवडून गेले. २०१९ ला त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली.
 १९७८ साली राज्यात पुलोदचे सरकार आल्यानंतर जुलै १९७८ ते फेब्रुवारी १९८० या काळात त्यांनी कृषी, ग्रामविकास आणि विधी व न्याय खात्याचे मंत्री म्हणून  काम पाहिले. १९७७ साली ते विधानसभेत विरोधी पक्षनेता होते. पुरोगामी लोकशाही आघाडी शासनामध्ये १९ ऑक्टोबर १९९९ ते मे २००२ पर्यंत पणन, रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून १९९०, २००४ आणि २००९ साली काम पाहिले. त्याशिवाय विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचे प्रमुख, विधानमंडळाच्या अंदाज, लोकलेखा, कामकाज सल्लागार, उपविधान, सार्वजनिक उपक्रम, विनंती अर्ज इत्यादी समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. 

Web Title: The end of loyalty ..., Ganapatrao Deshmukh ... a generation of politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.