मंदिरांनंतर आता रामलीलावरून 'महाभारत'; भाजपच्या नव्या मागणीला शिवसेनेकडून प्रत्युत्तर

By कुणाल गवाणकर | Published: October 16, 2020 02:15 PM2020-10-16T14:15:03+5:302020-10-16T14:23:24+5:30

Ramleela BJP Shiv sena: राज्यात रामलीला साजरी करण्यास परवानगी द्या; भाजपचं मुख्यमंत्र्यांना पत्र

bjp writes to cm uddhav thackeray over celebrating ramleela shiv sena hits back | मंदिरांनंतर आता रामलीलावरून 'महाभारत'; भाजपच्या नव्या मागणीला शिवसेनेकडून प्रत्युत्तर

मंदिरांनंतर आता रामलीलावरून 'महाभारत'; भाजपच्या नव्या मागणीला शिवसेनेकडून प्रत्युत्तर

Next

मुंबई: मंदिरं खुली करण्याच्या मागणीनंतर आता भाजपनं रामलीला आयोजनाच्या परवानगीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. राज्यातील मदरसे बंद करण्याच्या मागणी करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता रामलीला आयोजनास परवानगी देण्याची मागणी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.




रामलीला आयोजनास मुभा देण्याची मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 'राज्यात रामलीलेची मोठी परंपरा आहे. कोरोना काळात रामलीला अतिशय सहज आयोजित केली जाऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंदिरं खुली करण्यास परवानगी दिली नाही. मग आता किमान रामलीला आयोजनास तरी परवानगी द्यावी,' असं भातखळकर म्हणाले.



भातळखकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाची आठवण करून दिली. 'उद्धव ठाकरेंनी किमान बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व लक्षात ठेवायला हवं. बाळासाहेब आज जिवंत असते, तर त्यांनी सर्वप्रथम मंदिरं खुली केली असती आणि त्यानंतर बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल उघडली असती,' असं भातखळकर यांनी म्हटलं.

रामलीला आयोजनासाठी परवानगी मागणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'गेल्या कित्येक वर्षांपासून काही जण रामाच्या नावानं राजकारण करत आहेत. आजही ती मंडळी मतं मागण्यासाठी तेच राजकारण करत आहेत. एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आहे. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली आहे. मात्र तरीही अशा मागण्या केल्या जात आहेत. कोरोना संकट संपताच मुख्यमंत्री स्वत: सगळी धार्मिकस्थळं सुरू करतील,' असं सरनाईक म्हणाले. 

दोनच दिवसांपू्र्वी मंदिरांवरून शंखनाद; मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 'सामना'
‘तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या 'सेक्युलर' शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो 'सेक्युलर' शब्द तुम्ही स्वीकारला आहे, असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात अद्याप प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली. एकीकडे राज्यात बार, रेस्टोरंट आणि समुद्र किनारे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, दुसरीकडे देव-देवता मात्र लॉकडाऊनमध्ये अडकून पडले आहेत. मागच्या तीन महिन्यात विविध शिष्टमंडळांनी माज्याकडे प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी केली. यात धार्मिक नेते, व्यक्ती, सामाजिक संस्था आणि राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे.

दिल्लीत ८ जूनला मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला. त्याच सुमारास देशभरात मंदिरे उघडली गेली. मात्र, त्यामुळे कुठे कोरोनाची लाट आल्याचे चित्र नाही. त्यामुळे आवश्यक काळजी घेत सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे.

पत्राच्या सुरुवातीलाच ठाकरे यांना उद्देशून राज्यपाल म्हणतात, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावरुन नागरिकांशी संवाद साधताना मिशन बिगीन अंतर्गत पुनश्च हरिओमची घोषणा केली होती. याच भाषणात तुम्ही लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची लोकप्रिय घोषणाही केली होती. लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या नागरिकांना तुमच्या या शब्दांनी आशेचा किरण दिसला होता. परंतु या सार्वजनिकरित्या तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यांनंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत.

११ ऑक्टोबर रोजी सार्वजनिकरित्या बोलताना तुम्ही मंदिराचं लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली. एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरंट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळी दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले. गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांचाही समावेश होता, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही!
माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही,अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. तसेच महाराष्ट्राला अथवा राज्याच्या राजधानीला, पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत-खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा सणसणीत टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.

‘मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का?’ असा प्रश्न राज्यपालांनी पत्रात विचारला होता. त्यावर ठाकरे म्हणतात, आपल्याला असा प्रश्न का पडावा? आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र मी एवढा थोर नाही. केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे ‘सेक्युलर’ असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्वाचा गाभाच ‘सेक्युलर’ आहे, तो आपल्याला मान्य नाही का, असा सवाल ठाकरे यांनी राज्यपालांना केला आहे.

ठाकरे पुढे म्हणतात, इतर राज्यात, देशात बरेवाईट काय घडते आहे, ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. आपल्याला अनेक शिष्टमंडळांनी भेटून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत विनंती केली. त्यातली तीन पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो! प्रार्थना स्थळं उघडण्याबाबत सरकार जरुर विचार करत आहे. पण जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे होते तसेच तो एकदम उठवणे देखील अयोग्य आहे. घरोघरी जाऊन उपचार करणारे महाराष्ट्र हे देशातले एकमेव राज्य आहे, अशी आठवण करून देत, ठाकरे यांनी राज्यपालांच्या विनंतीचा सरकार गांभीर्याने विचार करत असून, सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी खात्री देतो असेही ठाकरे यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.

Web Title: bjp writes to cm uddhav thackeray over celebrating ramleela shiv sena hits back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.