जलवाहिन्या हजारो किमी, साठा कोट्यवधी लिटर, तरी शहरात पाणीटंचाई का? व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:21 IST2026-03-24T13:20:46+5:302026-03-24T13:21:11+5:30
दररोज सुमारे ५५० ते ६५० एमएलडी पाणी उपलब्ध असतानाही अनेक भागांत कमी दाब, अनियमित पुरवठा आणि टंचाईचे चित्र कायम आहे

जलवाहिन्या हजारो किमी, साठा कोट्यवधी लिटर, तरी शहरात पाणीटंचाई का? व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : शहरात सुमारे अडीच ते तीन हजार किलोमीटर लांबीचे जलवाहिनी जाळे, ४५० ते ५५० दशलक्ष लिटर साठवण क्षमता आणि मोठ्या जलाशयांतून होणारा पाणीपुरवठा… अशी भक्कम यंत्रणा असतानाही नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहराला प्रामुख्याने पवना, आंद्रा, तसेच भामा-आसखेड या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दररोज सुमारे ५५० ते ६५० एमएलडी पाणी उपलब्ध असतानाही अनेक भागांत कमी दाब, अनियमित पुरवठा आणि टंचाईचे चित्र कायम आहे. शहरात पुरेसे पाणी उपलब्ध असूनही गळती, चोरी, नियोजनाचा अभाव आणि अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे टंचाई निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत असताना प्रशासनाकडून ठोस व दीर्घकालीन उपाययोजना होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. आता तरी गळती रोखणे, अनधिकृत वापरावर कारवाई आणि पाणीपुरवठ्याचे शास्त्रीय नियोजन या बाबींवर भर दिला नाही, तर “पाणी आहे; पण पोहोचत नाही” हीच शहराची कायमची ओळख ठरणार, अशी भीती व्यक्त होत आहे.
गळतीतूनच हजारो लिटर पाणी ‘गायब’
शहरातील जुनी व गंजलेली पाइपलाइन, निकृष्ट दर्जाची कामे आणि अपुरी देखभाल यामुळे ४० टक्क्यांहून अधिक प्रमाणावर पाणी गळती होत आहे. अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरू होताच रस्त्यावर पाणी वाहताना दिसते. भूमिगत गळतीचा तर हिशोबच नसल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे वास्तव आहे.
पाणी चोरी आणि मोटारींचा खेळ
काळेवाडी, वाकड, थेरगावसारख्या भागांत अनधिकृत नळजोडणी आणि मोटारी लावून पाणी खेचण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे प्रेशर कमी होऊन नियम पाळणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नाही. कारवाईसाठी राजकीय दबाव येत असल्याचीही चर्चा रंगत आहे.
‘दाब’ नसलेला पाणीपुरवठा
निगडी प्राधिकरण, चऱ्होलीसारख्या भागांत पाणी इतक्या कमी दाबाने येते की, वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचत नाही. काही ठिकाणी पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, नागरिकांना मोटारी, टाक्या, टँकर किंवा वॉटर एटीएमचा आधार घ्यावा लागत आहे.