पावसाळ्यापूर्वी पवना धरणाची दुरुस्तीची कामे होणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 14:20 IST2026-05-10T14:20:07+5:302026-05-10T14:20:34+5:30
- धरणाच्या काही भागात किरकोळ गळती होत असल्याची चर्चा असून सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची गरज व्यक्त होत

पावसाळ्यापूर्वी पवना धरणाची दुरुस्तीची कामे होणार का ?
पवनानगर : पावसाळा जवळ येत असताना मावळ तालुक्यातील पवना धरणावरील दुरुस्तीच्या कामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धरणाचे दरवाजे, गळती रोखण्याची कामे, यांत्रिकी कामांची तपासणी तसेच डागडुजीची कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी करत आहेत.
धरणाच्या काही भागात किरकोळ गळती होत असल्याची चर्चा असून सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. विशेषतः धरणाचे दरवाजे, त्यांची उघडझाप करणारी यंत्रणा, गंजलेला भाग, तांत्रिक तपासणी आणि देखभालीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या धरणात पाणीसाठा वाढत असल्याने दरवाजे, यंत्रणा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा दुरुस्तीची कामे वेळेत होत नाही. पवना धरण मावळसह पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वाचा जलस्रोत असल्याने धरणाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हलगर्जी परवडणारी नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दरवाजे तपासणी आणि आवश्यक कामे प्रस्तावित, पण...
याबाबत जलसंपदा विभागाचे अधिकारी माणिक शिंदे म्हणाले की, धरणाचे दरवाजे व इतर आवश्यक दुरुस्तीची कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला असून मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने कामे केली जातील.
मात्र, केवळ प्रस्ताव आणि मंजुरीच्या प्रक्रियेत वेळ न घालवता प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी. पावसाळ्यापूर्वी धरणाची सर्वांगीण तपासणी करून आवश्यक डागडुजी आणि तांत्रिक दुरुस्ती पूर्ण केल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे.
पवना धरणावरील दरवाजे, गळती प्रतिबंधक उपाययोजना तसेच इतर आवश्यक दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. मंजुरीसाठी प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला आहे. मंजुरी मिळताच तातडीने सर्व कामे केली जातील. पावसाळ्यापूर्वी धरणाची यंत्रणा सुरक्षित व सुस्थितीत राहील यासाठी विभागाकडून आवश्यक काळजी घेतली जात आहे. - माणिक शिंदे, उपविभागीय अधिकारी, खडकवासला जलसंपदा विभाग