पिंपरी : शहरातील खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. चुकीचे पडताळणी केंद्र नमूद झाल्यामुळे पालकांना पौड, पिंपरी आणि आकुर्डी येथे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
आरटीई सोडत जाहीर झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, काही शाळांच्या प्रवेशपत्रांवर मुळशी तालुक्यातील पौड येथील केंद्राचा पत्ता देण्यात आला. प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांची पडताळणी पिंपरी किंवा आकुर्डी येथील केंद्रावर होणार असल्याचे तेथे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांना एकाच दिवशी अनेक ठिकाणी जावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील शाळांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रथम पौड येथे धाव घेतली. मात्र, तेथे पडताळणी होणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी पिंपरी आणि आकुर्डी केंद्रांकडे मोर्चा वळवला. या ठिकाणीही कर्मचारी अनुपस्थित असल्याने पालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली.
अपुरी मनुष्यबळ आणि स्पष्ट मार्गदर्शनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. अनेकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. फोनवर कोणतीही माहिती मिळत नसल्याने अडचणीत भर पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रवेशपत्रावर चुकीचे पडताळणी केंद्र नमूद केल्यामुळे पालकांची मोठी गैरसोय होत आहे. चौकशीसाठी दिलेले फोन क्रमांक उचलले जात नसल्याने अडचणी वाढत आहेत. ही जबाबदारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची असून, प्रशासनाची बेफिकिरी आणि असंवेदनशीलता स्पष्ट होत आहे. प्रवेश प्रक्रिया २० तारखेपर्यंत पूर्ण करायची असल्याने पालक हतबल झाले आहेत. महापालिका व शिक्षण विभागाने तातडीने मदत व तक्रार केंद्रांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत. - मुकुंद किर्दत, आप पालक युनियन, आम आदमी पार्टी.
कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर पाठवले जात असून, प्रशासनाकडून स्पष्ट सूचना दिल्या जात नाहीत. पौड, पिंपरी आणि आकुर्डी या ठिकाणी जाण्यासाठी भर उन्हात धावपळ होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करावी. - नीलेश गुजर, पालक, ताथवडे.
Web Summary : RTE admission verification issues in Pimpri-Chinchwad have parents scrambling due to incorrect center assignments. Verification centers are sending parents to multiple locations, causing frustration and delays. Lack of clear guidance and staff shortages exacerbate the problem.
Web Summary : पिंपरी-चिंचवड में आरटीई प्रवेश सत्यापन में गलत केंद्र आवंटन से अभिभावक परेशान हैं। सत्यापन केंद्र अभिभावकों को कई स्थानों पर भेज रहे हैं, जिससे निराशा और देरी हो रही है। स्पष्ट मार्गदर्शन और कर्मचारियों की कमी से समस्या बढ़ रही है।