...म्हणून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर त्या ट्रक ड्रायव्हर्सना शोधतेय मीराबाई चानू, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 02:19 PM2021-07-30T14:19:17+5:302021-07-30T14:23:00+5:30

Mirabai Chanu: जपानधील टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारोत्तोलनामध्ये मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकून भारताला पदकांचे खाते उघडून दिले होते. मीराबाई चानूच्या या यशाने जीवनात कितीही अडचणी समस्या आल्या तरी इरादे बुलंद असतील त्या तुम्हाला रोखू शकत नाही हे दाखवून दिले होते.

जपानधील टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारोत्तोलनामध्ये मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकून भारताला पदकांचे खाते उघडून दिले होते. मीराबाई चानूच्या या यशाने जीवनात कितीही अडचणी समस्या आल्या तरी इरादे बुलंद असतील त्या तुम्हाला रोखू शकत नाही हे दाखवून दिले होते.

पदक जिंकल्यानंतर मीराबाई चानू हिचे भारतामध्ये जोरदार स्वागत झाले. तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला. दरम्यान, तिचा जीवन प्रवास पाहिल्यास इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने किती खस्ता खाल्ल्या होत्या हे दिसून येईल. दरम्यान, या काळात तिला अनेक लोकांनी मदतही केली. अशाच एकेकाळी तिला मदत करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सचा सध्या मीराबाई चानू ही शोध घेत आहे. हे ट्रक ड्रायव्हर चानूला तिच्या नोंगपोक काकचिंग गावामधील तिच्या घरापासून खुमान लम्पक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील प्रशिक्षण केंद्रापर्यंत रोज मोफत नेत असत.

मीराबाई चानूचे कुटुंब अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगत होते. चानूच्या प्रशिक्षणावर होणारा रोजचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. चानूच्या घरापासून प्रशिक्षण केंद्र ३० किमी लांब होते. तिथे जाण्यासाठी तिला १०-२० रुपये दिले जात. हे पैसे पुरेसे नसत. असा परिस्थितीत चानूने एक मार्ग शोधून काढला होता. ती तिच्या घराजवळून जाणाऱ्या ट्रक ड्रायवरांकडे लिफ्ट मागत असे. त्यावेळी तिच्या मनात संकोच आणि भीती असे. मात्र धीर करून ती ट्रकमधून कोचिंग सेंटरमध्ये जात असे.

काही दिवसांनंतर हे ट्रक ड्रायव्हरही तिला ओखळू लागले होते. तसेच तिचे घर जवळ येताच ते लांबूनच हॉर्न वाजवत असत. त्यामुळे चानूला वेळीच तयार होऊन ट्रकपर्यंत पोहोचवता येत असे.

काही दिवसांनंतर चानू आणि ट्रक ड्रायव्हर्समध्ये एक वेगळ्याच प्रकारचे नाते निर्माण झाले. ड्रायव्हर दूरून हॉर्न वाजवत त्यामुळे ते माझ्या घरापासून किती जवळ आले आहेत. हे मला कळत असे. हे ट्रक ड्रायव्हर तिच्याकडून कधीही भाड्याचे पैसे घेत नसत. त्यामुळे जे पैसे तिला प्रवासखर्चासाठी मिळत, त्यामध्यमातून चानू सरावादरम्यान, काही खाद्यपदार्थांची खरेदी करत असे.