Omicron Variant : ओमायक्रॉनचा भयावह वेग! देशातील रुग्णसंख्या 216 वर; महाराष्ट्रासह 'या' राज्यांनी वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 11:19 AM2021-12-22T11:19:57+5:302021-12-22T11:46:18+5:30

Omicron Variant And CoronaVirus News : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशभरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून काही ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान अनेकदा नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ देखील होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे.

देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल सहा हजार रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (22 डिसेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,317 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 318 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशाचा रिकव्हरी रेट 98.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासांत 6,906 रुग्ण बरे झाले आहेत. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

दिल्ली आणि महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडेवारी ही सर्वाधिक आहे. त्यामुळेच आता देशातील एकूण रुग्णसंख्या ही 216 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनचे जवळपास अर्ध्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत.

दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे 57 तर महाराष्ट्रात 54 रुग्ण आहेत. आतापर्यंत 90 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

तेलंगणामध्ये ओमायक्रॉनचे 24, कर्नाटकमध्ये 19, राजस्थानमध्ये 18, केरळमध्ये 15, गुजरातमध्ये 14, जम्मू-काश्मीरमध्ये 3, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये 2-2 रुग्ण आढळले आहेत तसेच आंध्र प्रदेश, चंडीगड, लडाख, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी तब्बव 90% लोकांना देखील ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसीच्या क्षमतेवर ब्रिटनमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे आणि त्यानुसार, केवळ फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. पण यासाठी या लसींचा बूस्टर डोस द्यावा लागेल.

जगातील बहुतांश देशांमध्ये या दोन्ही लसी उपलब्ध नाहीत. भारताच्या संदर्भात अभ्यासाविषयी बोलताना असं म्हटलं आहे की, ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका लसीने सहा महिन्यांच्या लसीकरणानंतर ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्याची कोणतीही क्षमता दर्शविली नाही.

भारतात लसीकरण केलेल्या 90 टक्के लोकांना AstraZeneca लस Covishield या नावाखाली मिळाली आहे. या लसीचे 65 दशलक्षाहून अधिक डोस 44 आफ्रिकन देशांमध्ये वितरित केले गेले आहेत.

जगातील बहुतेक देशांची लसीकरण मोहीम या लसींवर आधारित असल्याने महामारीच्या नवीन लाटेचा प्रभाव व्यापक असू शकतो. जगातील कोट्यवधी लोकांचं लसीकरण करण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढल्यानं नवीन व्हेरिएंट उदयास येण्याचा धोका वाढतो.