करुन दाखवलं! शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन मोदी सरकारनं पूर्ण केलं; महाराष्ट्रात उद्या शुभारंभ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 09:31 PM2020-08-06T21:31:08+5:302020-08-06T21:37:07+5:30

केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात किसान रेल चालवण्याची घोषणा केली होती. मोदी सरकारने दिलेले हे वचन उद्यापासून पूर्ण होणार आहे. आता देशातील शेतकरी रेल्वेमार्गे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात फळे आणि भाजीपाला विकू शकतील. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल असा सरकारचा विश्वास आहे.

केंद्राने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान जाहीर केले होते की, शेतकरी आपला शेतमाल देशातील त्या भागात विकू शकतील ज्याठिकाणी त्याला चांगला भाव मिळत आहे. यासाठी किसान रेल्वे चालविण्यात येणार आहे.

निश्चितच किसान रेल एक उत्कृष्ट पाऊल आहे. कारण देशात फळे आणि भाज्या मोठ्या प्रमाणात खराब होतात, अनेकदा शेतकर्‍यांचा माल बाजारात पोहचत नाहीत. अशा परिस्थितीत, शेतकरी रेल्वे उपयुक्त ठरेल. शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांना योग्य आणि मोबदला देणारा भाव मिळेल.

रेल्वेच्या माहितीनुसार शुक्रवारी पहिली किसान स्पेशल पार्सल ट्रेन महाराष्ट्रातील देवळालीहून सुटेल आणि बिहारमधील दानापूरला पोहोचेल. केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये केलेल्या आश्वासनानुसार त्यामध्ये वाहतुकीयोग्य सामन पाठविलं जाईल.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही गाडी शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवळालीहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता दानापूरला पोहोचेल. १५१९ किलोमीटरचा हा प्रवास ३२ तासात पूर्ण होईल. त्याचप्रमाणे ही गाडी रविवारी दानापूरहून आपल्या परतीचा प्रवास करेल आणि दुसर्‍या दिवशी सोमवारी देवळालीला पोहोचेल.

मध्य रेल्वेच्या किसान स्पेशल पार्सल गाडीच्या परतीमध्ये दर रविवारी ९ ते ३० ऑगस्ट दरम्यान दानापूरहून दुपारी १२ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १९.४५ वाजता देवळाली पोहोचेल

रेल्वेच्या म्हणण्यानुसार नाशिक व आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात ताजी फळे, भाज्या, फुलके, कांदे व इतर कृषी उत्पादनांचे उत्पादन केले जाते, ज्यास इतर राज्यांत मोठी मागणी आहे. ही उत्पादने पटना, प्रयागराज, कटनी आणि सटाना यासारख्या भागात पाठविली जातील

किसान ट्रेनचे स्थानक नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सटाना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, पंडित दिन दयाल उपाध्याय नगर आणि बक्सर येथे असेल.

किसान रेलमध्ये रेफ्रिजरेटेड डबे असतील. या रेल्वेने १७ टन क्षमतेसह नवीन डिझाइन म्हणून तयार केले आहे. हे रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथळा येथे बनवले आहेत.

किसान स्पेशल गाड्यांमध्ये १० पार्सल व्हॅन आणि एक लगेज ब्रेक व्हॅन असेल. रेल्वेच्या म्हणण्यानुसार जर शेतकर्‍यांची मागणी असेल तर ट्रेनचे थांबेही वाढवता येईल. त्याच्या बुकिंगसाठी शेतकरी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात

या ट्रेनमधील कंटेनर फ्रिजसारखे असतील. म्हणजे चालता-फिरता कोल्ड स्टोरेज असेल ज्यामध्ये शेतकरी नाशवंत भाज्या, फळे, मासे, मांस, दूध ठेवण्यास सक्षम असतील. सुरुवातीला ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावेल.

Read in English