Andhra Pradesh Floods : बालाजी वाचवा! मुसळधार पावसानं आध्रात हाहाकार; तिरूपती मंदिरात पाणी घुसलं, नद्या-नाले-रस्त्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 09:33 PM2021-11-19T21:33:27+5:302021-11-19T21:44:49+5:30

Heavy Rains Create Havoc In Tirupati : तिरुमला मंदिर परिसरातही प्रचंड पाऊस झाला. यामुळे संबंध मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. येथे अडकलेल्या भाविकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) गुरुवारी पावसाने हाहाकार माजवला. मुसळधार पावसामुळए येथील नद्या-नाले आणि रस्तेही दुथडी भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे येथील प्रसिद्ध तिरुपती मंदिरातही (Tirupati Temple) पाणी शिरले आहे. एवढेच नाही, तर अनेक ठिकाणी वाहने आणि जणावरे वाहून गेल्याचेही वृत्त आहे.

तिरुमला मंदिर परिसरात प्रचंड पाऊस झाला. यामुळे संबंध मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. येथे अडकलेल्या भाविकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानमने (TTD), आधीच मुसळधार पावसाचा अंदाज पाहता अलीपिरी आणि श्रीवरीमेटलू दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती.

तिरुमला येथील वैकुंठम परिसरालाही पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. परिसराच्या तळघरातही पाणी घुसले आहे. विशेष म्हणजे टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी धर्मा रेड्डी यांच्या घरातही पाणी घुसल्याचे समजते.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेशातील अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. चित्तूर, कडप्पा आणि नेल्लोर जिल्ह्याना सर्वाधिक फटका बसल्याचे दिसत आहे. या जिल्ह्यांतील अनेक सखल भागांत पाणीच पाणी झाले आहे.

येथील अनेक रहिवासी भागांत आणि घरांतही मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या वेगामुळे रस्तेही तुटले आहेत. यामुळे लोकांना मोठा त्रास होत आहे.

उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रमध्ये मुसळधार पाऊस होत असून तो सुरूच राहण्याची शक्यता आहे.

रेनिगुंटा विमानतळदेखील जलमय झाले, यामुळे अधिकाऱ्यांना उड्डाणे वळवावी लागली. हैदराबाद-तिरुपती इंडिगो विमान बेंगळुरूला वळवण्यात आले. तर हैदराबाद-तिरुपती एअर इंडिया आणि स्पाइसजेटच्या विमानांना हैदराबादला परतावे लागले.

दुसरीकडे तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारी रात्री उशिरा सतर्कतेचा इशारा दिला आहे. यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानुसार, कोईम्बतूर, तिरुकुवल्लूर, कांचीपुरम, चेन्नई आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

महत्वाचे म्हणजे, दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ईशान्य मान्सून तमिळनाडूच्या किनार्‍यावर धडकतो आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो.

मुसळधार पावसामुळे तिरुपती बालाजी मंदिर परिसरात सर्वत्र अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते...