अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 21:45 IST2025-06-17T21:43:27+5:302025-06-17T21:45:25+5:30
अहमदाबाद विमान अपघाताची घटना एवढी भयावह होती की, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी, मृतांच्या कुटुंबीयांचे आणि नातेवाईकांचे डीएनए नमुने घ्यावे लागले...

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २७० जणांना आपला जीव गमवावा लागला. हे विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. यानंतर, संपूर्ण परिसर आग आणि धूरच धूर पसरला होता.
यानंतर येथील लोक आपला जीव वाचवण्यासाठी मार्ग दिसेल तिकडे धावू लागले. यावेळी त्यांच्या मौल्यवान वस्तू आणि साहित्य, जसे की, सोन, पैसे, बॅग, पासपोर्ट सारख्या अनेक महत्वाच्या वस्तू मागेच राहिल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, काही प्रत्यक्षदर्शींनी ढिगाऱ्याच्या राखेतून काही वस्तू बाहेर काढल्या आहेत आणि त्या पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत.
विमान अपघातादरम्यान, राजू पटेल नावाचा एक व्यवसायिक घटनास्थळी उपस्थित होता. अपघात होताच तो घटनास्थळी पोहोचला. यानंतर, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली, तेव्हा तोही बचाव कार्यात सहभागी झाला. अधिकाऱ्यांनी पटेल यांना मदत करण्याची परवानगी दिली होती. यावेळी, त्यांना ढिगाऱ्यातून बऱ्याच वस्तू सापडल्या, ज्या नंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या
राजू पटेल म्हणाले, आपल्याला विखुरलेल्या ढिगाऱ्यातून ७० तोळे सोन्याचे दागिने, ८०००० रुपये रोख रक्कम आणि अनेक लोकांचे पासपोर्टही सापडले होते. याचवेळी एक भगवद्गीता देखील आढळली. जिची माध्यमे आणि सोशल माध्यमांवर चर्चाही झाली. या सर्व वस्तू पोलिसांकडे सोपवण्यात आल्या आहेत.
राजू म्हणाले, अपघातानंतर आम्ही प्रथम आग नियंत्रित येण्याची वाट बघत होतो. त्यानंतर आम्ही सुरक्षा पथकांना बचाव कार्यात मदत केली.
अहमदाबाद विमान अपघाताची घटना एवढी भयावह होती की, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी, मृतांच्या कुटुंबीयांचे आणि नातेवाईकांचे डीएनए नमुने घ्यावे लागले. या अपघातात विमानाने प्रवास करणारे लोक, डॉक्टर, रुग्णालय आणि इमारत परिसरात उपस्थित असलेले कामगार आदी, अशा २७० जणांना आपला जीव गमवावा लागला.