DGCAच्या कारवाईचा परिणाम; SpiceJetने 80 वैमानिकांना पगाराशिवाय सक्तीच्या रजेवर पाठवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 09:01 PM2022-09-20T21:01:35+5:302022-09-20T21:04:50+5:30

Spicejet एअरलाइन्स गेल्या काही काळापासून मोठ्या तोट्यात आहे.

Spicejet Flight Ban: स्पाईसजेट विमान कंपनीची आर्थिक स्थिती आधीच फारशी चांगली नव्हती. यातच डीजीसीएने कंपनीवर केलेल्या कठोर निर्बंधांनंतर कंपनीची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. यामुळेच आता स्पाइसजेटने आपल्या 80 वैमानिकांना पगाराशिवाय वैमानिकांना 3 महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या बातमीनुसार, स्पाइसजेटने या 80 वैमानिकांना पगाराशिवाय तीन महिन्यांच्या रजेवर पाठवले आहे. 27 जुलै 2022 रोजी विमान वाहतूक नियामक DGCA ने स्पाईसजेट विमानातील सततच्या तांत्रिक त्रुटींमुळे मोठी कारवाई करत 8 आठवड्यांसाठी 50% फ्लाइट्सवर बंदी घातली आहे. DGCA ने सांगितले होते की, या आठ आठवड्यांसाठी एअरलाइनला अतिरिक्त निगराणीखाली ठेवले जाईल.

डीजीसीएने आपल्या आदेशात म्हटले होते की, स्पाइसजेट एअरलाईनला भविष्यात 50 टक्क्यांहून अधिक उड्डाणे हवी असतील, तर हा अतिरिक्त भार उचलण्याची क्षमता, पुरेशी संसाधने आणि कर्मचारी उपलब्ध असल्याचे सिद्ध करावे लागेल. स्पाईसजेटच्या ताफ्यात 90 विमानांचा समावेश आहे, परंतु DGCA च्या आदेशानंतर कंपनी फक्त 50 विमाने चालवत आहे.

या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचा हवाला देत रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, जे पायलट 'विना पगारी रजेवर गेले' त्यापैकी 40 पायलट B737 विमानाचे आहेत, तर 40 Q400 विमानाचे पायलट आहेत. या वैमानिकांना तात्पुरत्या उपाययोजनांतर्गत रजेवर पाठवण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

यामुळे कंपनीला खर्च कमी करण्यास मदत होईल. दरम्यान, स्पाइसजेटने आपल्या निवेदनात म्हटले की, कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढले जात नाहीय. कोविड महामारीच्या काळातही कंपनीने टाळेबंदी केली नाही. रजेवर जाणार्‍या या वैमानिकांच्या कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही विमान कंपनीने स्पष्ट केले आहे.

रिपोर्टमध्ये स्पाइसजेट गेल्या अनेक महिन्यांपासून तोट्यात असल्याचे म्हटले आहे. जून तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून रु. 784 कोटी झाला, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत रु. 731 कोटी होता. आर्थिक वर्षानुसार तोट्याचा आलेख पाहिल्यास, स्पाइसजेटला FY19, FY20, FY21 आणि FY22 मध्ये अनुक्रमे रु. 316 कोटी, रु. 934 कोटी, रु. 998 कोटी आणि रु. 1,725 ​​कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे.