PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 6000 रुपये पती-पत्नीला मिळू शकतात का? जाणून घ्या कोण कोण पात्र, अपात्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 12:03 PM2021-11-04T12:03:45+5:302021-11-04T12:10:26+5:30

PM Kisan Yojana Rules for Farmers: अनेकांकडे पतीच्या नावावर आणि पत्नीच्या नावावर शेत जमीन असते. काहीवेळा पत्नीला तिच्या माहेरहून मिळालेली असते.

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेनुसार वर्षाला 6000 रुपये देते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये पाठविले जातात. मात्र, या योजनेबाबत लोकांनी एक ना अनेक प्रश्न विचारले आहेत.

https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर शंका विचारण्यात आल्या आहेत. यामध्ये एक प्रश्न असा आहे की, पती-पत्नीला वेगवेगळे 6000 हजार रुपये म्हणजेच 12000 रुपये मिळू शकतात का?

अनेकांकडे पतीच्या नावावर आणि पत्नीच्या नावावर शेत जमीन असते. काहीवेळा पत्नीला तिच्या माहेरहून मिळालेली असते. पीएम किसान सन्मान योजनेचे काही नियम आहेत. यानुसार एका कुटुंबातील एक व्यक्ती पती किंवा पत्नी जर पीएम किसान योजनेचा लाभार्थी असेल तर त्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

जर एकाच कुटुंबातून दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज केला गेला तर ते बोगस ठरविले जाईल. तसेच एकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल. याशिवाय जर एखादा शेतकरी आयकर भरत असेल तर तो देखील या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. आयकर भरणाऱ्या दांम्पत्याला देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

जे शेतकरी आपल्या जमिनीचा वापर शेतीसाठी करत नाहीत किंवा शेतीच करत नाहीत ते देखील या योजनेसाठी अपात्र आहेत. ज्या लोकांची स्वत:ची शेती नाही किंवा जे दुसऱ्यांच्या शेतात मजूर म्हणून किंवा भाडेपट्ट्याने घेऊन काम करतात ते देखील अपात्र ठरतात.

तसेच एखादा व्यक्ती शेतकरी आहे, तो शेतीही करतो परंतू तो सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त झाला असेल किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल तर तो देखील पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरत नाही.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात आजवर 9 हप्ते वळते केले आहेत. मात्र, अजून 10 वा हप्ता आलेला नाही, तो लवकरच शेतकऱ्यांना दिला जाईल असे सांगितले जात आहे. मात्र, जर तुम्ही अद्याप पीएम किसान योजनेसाठी अर्ज केला नसेल तर करू शकता.

Read in English