पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 06:37 PM2024-05-15T18:37:15+5:302024-05-15T18:38:24+5:30
Lok Sabha Election 2024 : पीओके हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले.
![PoK is part of India, our right over it - Amit Shah | पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह PoK is part of India, our right over it - Amit Shah | पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/amit-shah-18-g-k-k-m_202112740044.jpg)
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
Amit Shah : नवी दिल्ली : पीओके (PoK) हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. दरम्यान, सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआयला मुलाखत दिली. यावेळी पीओके हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले.
फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेसचे नेते आज पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याचे सांगत आहेत. पीओकेची मागणी करत नाहीत. मला त्यांना विचारायचे आहे की, १३० कोटी लोकसंख्येचा देश कोणाच्या तरी भीतीने आपले हक्क सोडणार का? राहुल गांधींनी पाकिस्तानच्या सन्मानाबद्दल बोलून त्यांच्या पक्षाच्या लोकांना काय म्हणायचे आहे ते सांगावे? असा सवाल करत अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केल्याबद्दल अमित शाह म्हणाले, "हा काही नियमित निर्णय नाही, असे मला वाटते. या देशातील अनेक लोकांचा म्हणणे आहे की, स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली आहे". तसेच, अमित शाह यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेबद्दल आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराविषयी विचारण्यात आले. यावेळी अमित शाह म्हणाले, "सध्या ते (अरविंद केजरीवाल) दुसऱ्या प्रकरणात अडकले आहेत (स्वाती मालीवाल यांच्यावरील हल्ला प्रकरण), त्यांना यातून मुक्त होऊ द्या. बघूया काय होते ते."
कोणीही कोठूनही निवडणूक लढवू शकतो - अमित शाह
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड (केरळ) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) मधून लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल अमित शाह म्हणाले, "कोणीही कोठूनही निवडणूक लढवू शकतो, पण राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वीच सांगायला हवे होते की, ते दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ते लपवणे योग्य नाही असे मला वाटते. त्यांनी वायनाडच्या लोकांना त्याबद्दल सांगायला हवे होते, जेव्हा तुम्ही मतदानोत्तर सर्वेक्षणात धोका पाहता आणि मग तुम्ही रायबरलीला येता, हे मला योग्य वाटत नाही."