१३ कोटी खर्चून ब्रिज बांधला, पहिल्याच पावसात मोडून पडला, भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 01:35 PM2021-05-28T13:35:27+5:302021-05-28T13:39:44+5:30

bridge collapsed: नदीवर कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला पूल यास चक्रीवादळाचा वेग झेलू शकले नाही. हाराडीह-बुढाडीह पूल मध्यभागातून मोडून पडला.

रांचीमधील कांची नदीवर कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला पूल यास चक्रीवादळाचा वेग झेलू शकले नाही. हाराडीह-बुढाडीह पूल मध्यभागातून मोडून पडला. हा पूल रांची जिल्ह्यातील तमाड, बुंडू आणि सोनाहातू या भागांना जोडत होता. काल संध्याकाळी साडेचारच्या सुमाराच हा पूल तुटला. तीन वर्षांपूर्वी ग्रामीण विकास विभागाच्या विशेष प्रमंडळाने १३ कोटी रुपये खर्चून हा ब्रिज बांधला होता.

६०० मीटर लांब असलेला हा पूल अचानक कोसळल्याने दोन्हीकडचे नागरिक दोन्ही बाजूंना अडकून पडले. या पुलाच्या बांधकामावेळी अनेक त्रुटी ठेवल्या गेल्या. पुलाच्या भक्कमपणाच्यादृष्टीने विशेष काही केले गेले नाही. दलदलीमध्येच पूलाचे पिलर उभे केले गेले. त्यामुळे पाया कमकुवत झाला आणि अखेर आजचे वादळ हे पूल झेलू शकले नाही, असा दावा बुढाडीह गावातील रहिवाशांनी केला आहे.

पुलाच्या आसपास नदीच्या पात्रामधून मोठ्या प्रमाणात होणारे अवैध वाळूचे उत्खनन हेसुद्धा पूल तुटण्यामागचं एक कारण असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. वाळूतस्कर नदीच्या पात्रात जेसीबी लावून वाळूचे उत्खनन करतात. त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

पूल तुटल्यानंतर स्थानिक आमदार विकास मुंडा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले की, यापूर्वीही एक उच्चस्तरीय पूल कोसळले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही पुलांचे बांधकाम एकाच कंपनीने केलेले आहे. त्यामुळे या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. अवैध वाळूच्या उत्खननामुळे याआधी दोन पूल कोसळले आहेत. आता कोसळणारा हा तिसरा पूल ठरला आहे.

या पुलाचे औपचारिक उदघाटन झाले नव्हते. त्याच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात होते, असे ग्रामस्थांनी संगितले. तसेच नदीपात्रातून रोज होणारे वाळूचे उत्खनन हे पूल कोसळण्यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत असून, प्रशासनाकडून तपास सुरू झाला आहे.

बंगालच्या उपसागरात आलेल्या यास वादळामुळे सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आता तुटलेले पूल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्यातरी प्रशासनाने या सर्व प्रकाराबाबत मौन बाळगले आहे.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या पुलाचे बांधकाम रांचीमधील ठेकेदार रंजन सिंह याने केले होते. याच ठेकेदाराने बांधलेले अजूने एक पूल जे कांची नदीवरच होते. ते पूल दोन वर्षांपूर्वी तुटले होते.

पूल तुटल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली असून, तुटलेले पूल पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येत आहेत. हे पूल खूप कमकुवत झाले असून, धोका कायम आहे, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.