'वाजले की बारा'... एक-दोन नव्हे, तर हे आहेत देशातील गाजलेले डझनभर घोटाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 12:32 PM2018-03-26T12:32:03+5:302018-03-26T12:32:03+5:30

जीप घोटाळाः स्वतंत्र भारतातील हा पहिला मोठा घोटाळा म्हणता येईल. भारत सरकारने लंडनच्या एका कंपनीला २००० जीपची ऑर्डर दिली होती. त्यासाठी ८० लाख रुपयांचा करार झाला होता. पण, प्रत्यक्षात देशाला मिळाल्या फक्त १५५ जीप. या कथित घोटाळ्याचा ठपका ब्रिटनमध्ये असलेले तेव्हाचे भारतीय उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यावर ठेवण्यात आला होता. पण या प्रकरणाची फाईल १९५५ मध्ये बंद झाली आणि त्यानंतर मेनन यांना नेहरू मंत्रिमंडळातही स्थान मिळालं.

मारुती घोटाळाः मारुती कंपनीची स्थापना होण्याआधीच्या या घोटाळ्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी नाव पुढे आलं होतं. पॅसेंजर कार बनवण्याच्या परवान्यासाठी त्यांनी संजय गांधींना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

बोफोर्स घोटाळाः देशाच्या राजकारणात आजही चर्चिल्या जाणाऱ्या बोफोर्स तोफ खरेदी घोटाळ्यात राजीव गांधी यांच्यासह अनेक नेते अडकले होते.

स्टॉक मार्केट घोटाळाः शेअर बाजारातील दलाल केतन पारेखने १ लाख १५ हजार कोटींचा घोटाळा केला होता. त्यात, डिसेंबर २००२ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

युरिया घोटाळाः माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे निकटवर्तीय असलेले नॅशनल फर्टिलायजरचे व्यवस्थापकीय संचालक सी एस रामाकृष्णन यांनी युरिया आयात करण्यासाठी १३३ कोटी रुपये दिले, पण हे खत आलंच नाही.

चारा घोटाळाः १९९६ मध्ये बिहारमध्ये हा सुमारे ३६० कोटींचा घोटाळा झाला. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह १६ जणांना दोषी ठरवण्यात आलंय. लालूंना चार वेगवेगळ्या खटल्यांमध्ये कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

स्टॅम्प पेपर घोटाळाः अब्दुल करीम तेलगीनं बनावट मुद्रांक शुल्क घोटाळ्यातून देशाला सुमारे २० हजार कोटी रुपयांना गंडा घातला.

सत्यम घोटाळाः कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठा घोटाळा. सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसने रिअल इस्टेट आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून देशाला तब्बल १४ हजार कोटींना फसवलं.

राष्ट्रकुल घोटाळाः राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनादरम्यान तब्बल ७० हजार कोटी रुपयांचा गोलमाल झाला. त्यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली. सुरेश कलमाडी हे या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत.

टू जी घोटाळाः २०११च्या सुरुवातीला उघडकीस आलेल्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने देश हादरून गेला होता. स्पेक्ट्रम वाटपादरम्यान माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणि काही सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचं हे प्रकरण होतं. परंतु, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या घोटाळ्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता केली आहे.

पीएनबी घोटाळाः सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत लेटर ऑफ अंडरटेकिंगचा वापर करून हिरे व्यापारी नीरव मोदीनं ११ हजार कोटींचा गंडा घातला.

आदर्श घोटाळाः भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी-जवानांसाठी देण्यात आलेल्या जमिनीवर आदर्श गृहनिर्माण सोसायटी उभी राहिली. पण त्यातील जागा प्रशासकीय अधिकारी, नेतेमंडळी आणि कुटुंबीयांना देण्यात आल्या. या घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं.