Two Years OF Mahavikas Aghadi Government : ती पाच कारणे ज्यामुळे महाराष्ट्रात अजून तरी अयशस्वी ठरतंय भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 12:33 PM2021-11-28T12:33:24+5:302021-11-28T12:45:39+5:30

Two Years OF Thackeray Government: शिवसेनेने भाजपाची साथ सोडत Congress आणि NCPला सोबत घेत Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्याने भाजपाला मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून BJPचे नेते सरकार पडण्याच्या तारखांवर तारखा देताहेत मात्र महाराष्ट्रात 'Operation Lotus' यशस्वी होऊ शकलेलं नाही. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

आज २८ नोव्हेंबर. २०१९ च्या विधानसभा निडणुकीनंतर मोठी उलथापालथ होऊन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्याने भाजपाला मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून भाजपाचे नेते सरकार पडण्याच्या तारखांवर तारखा देताहेत मात्र महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस यशस्वी होऊ शकलेलं नाही. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

काही दशकांपूर्वी देशात असलेल्या बिगर काँग्रेस राजकारणाप्रमाणे आता बिगर भाजपा राजकारण रुढ होत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या परंपरागत भाजपाविरोधी पक्षांना शिवसेना जाऊन मिळाली आहे. आपण एकमेकांची साथ सोडल्यास त्याचा फायदा भाजपाला होईल याची स्पष्ट कल्पना या पक्षांना आहे. त्यामुळे काही झालं, कितीही मतभेद झाले तरी महाविकास आघाडी मोडायची नाही, फूट पडू द्यायची नाही, याची खबदारी तिन्ही पक्षांकडून घेतली जात आहे.

२८८ सदस्य असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी १४५ धावांची गरज असते. मात्र भाजपाकडे २०१९ च्या निवडणुकीत जिंकलेल्या १०५ आणि पंढरपूर पोटनिवडणुकीत जिंकलेली एक अशा १०६ आणि अपक्ष व इतर अशा मिळून ११० ते ११५ सदस्यांचा पाठिंबा आहे. मात्र १४५ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाला ३५ ते ४० आमदारांची गरज आहे, ही बाब सध्यातरी शक्य नाही.

ज्यांच्या निर्णायक प्रयत्नांमुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्या शरद पवार यांचे महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांवर उत्तम नियंत्रण आहे. सरकारमध्ये काही मतभेद वा वाद झाल्यास शरद पवार तो पुढाकार घेऊन मिटवतात. त्यामुळे वैचारिक विरोधाभासानंतरही हे सरकार सहजपणे वाटचाल करत आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर चार महिन्यातच कोरोनाचे संकट आले. तसेच लॉकडाऊन लावण्यात आले. तेव्हापासून राज्यातील परिस्थिती अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. अशा परिस्थितीत सरकार पाडले गेल्यास त्याचा भाजपाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. तसेच महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना सहानूभुती मिळू शकते.

पुढच्या काळात काय होऊ शकते येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुक आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपाला चांगलं यश मिळाल्यास मिशन लोटसला पुन्हा वेग येईल. मात्र तसे न होता महाविकास आघाडीमधील पक्षांनी माजी मारल्यास भाजपाचे मिशन लोटस पुन्हा एकदा पुढे ढकलले जाईल.