राज्यसभा निकालाचे मुद्दे अन् गुद्दे; आशिष शेलारांनी उलगडलं भाजपाच्या यशाचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 08:44 PM2022-06-11T20:44:38+5:302022-06-11T20:55:46+5:30

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीने चमत्कार केल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. कारण २ उमेदवार निवडून येतील इतके संख्याबळ असताना भाजपानं तिसरा उमेदवारही विजयी करून दाखवला.

राज्यसभेच्या निकालात भाजपाचे पीयुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक यांचा विजय झाला. तर काँग्रेसचे इमरान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊतही राज्यसभेत पोहचले. परंतु शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले.

आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्यसभा निकालाचे काही मुद्दे आणि गुद्दे पोस्ट केले आहेत. यातून भाजपाच्या यशाचं रहस्य समोर आले. त्याचसोबत महाविकास आघाडी यांच्या ३ पक्षातील समन्वयाचा अभावही प्रखरतेने दिसला.

आशिष शेलारांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसनं शिवसेनेला मदत केली नाही. भाजपाकडे ११३ मतांचा कोटा असताना १२३ मते कशी व कुठून आली? शिवसेनेच्या प्रथम पसंतीचे उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा धनंजय महाडीक यांना मते जास्त पडली

नेत्यांची काळजी आणि शिवसैनिक वाऱ्यावर? MIM ची मते घेऊन औरंगजेबीची युती अखेर केलीच. आता औरंगाबाद नामांतराचे काय? सपाची मते ही चालवून घेतली तेव्हा ह्दयातला राम कुठे काढून ठेवला? आता सांगा कोण कुणाची बी टीम असा सवाल शेलारांनी शिवसेनेला विचारला.

महाराष्ट्रात संजय पवार हारतो आणि इम्रान प्रतापगढी जिंकतो, हे प्रताप महाराष्ट्र बघतोय. उघड मतदानात जे चित्र समोर आले त्याने एवढे बावचळलेत. विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदानाने होणार तेव्हा काय करणार? असंही शेलार म्हणाले.

त्याचसोबत अंतर्विरोधाचा तिन तिघाडा किती दिवस झाकणार? भाजपा नेत्यांच्या घरातील तथाकथित अनधिकृत बांधकामे शोधण्यापेक्षा सरकारमधील फूट शोधण्याचा किमान समान कार्यक्रम राबवा असा टोला भाजपा नेते आशिष शेलारांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

या निकालाबाबत राष्ट्रवादीचे छगन भुजबळ म्हणाले की, राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया किचकट आहे. पहिल्याच फेरीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे हा आमचा प्रयत्न होता. संजय राऊत यांचीच अडचण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती असं त्यांनी सांगितले.

तसेच सरकार असताना आम्ही १७० ऐवजी १८० ची बेरीज करायला पाहिजे होती. त्यात आम्ही निश्चित कमी पडलो आहोत. तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणावर यावेळी उफाळून आली. मविआचा कोणताही आमदार आपल्याच पक्षाचा आहे असं समजूनच काम करायला पाहिजे असं भुजबळ म्हणाले.

तर बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेला मतं दिली नाहीत, ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.