...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 02:47 PM2020-06-02T14:47:21+5:302020-06-02T14:51:23+5:30

मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरून भाजपासोबतच संघर्ष शिगेला गेल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडी सरकारनं नुकतेच सहा महिने पूर्ण केले.

तब्बल शंभरपेक्षा जास्त आमदार असलेल्या भाजपानं महाविकास आघाडी सरकारला धक्का देण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे ठाकरे सरकार किती काळ टिकणार, असा प्रश्न सरकारच्या स्थापनेपासूनच विचारला गेला.

महाविकास आघाडी सरकारचं पाच वर्ष टिकेल, असा विश्वास तिन्ही पक्ष व्यक्त करत आहेत. आता या सरकारच्या भविष्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केलं आहे.

आघाडी सरकारमधलं कोणीही नाराज होऊन बाहेर पडलं तर हे सरकार वाचू शकत नाही, असं सूचक भाष्य अमित शहांनी केलं. 'सीएनएन न्यूज१८' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारचं पाडण्यासाठी भाजपा कोणतेही प्रयत्न करणार नसल्याचंही शहांनी सांगितलं.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सत्तेत आहेत. ते राज्य सरकार चालवत आहेत. त्यांच्यातील विश्वासाला तडा जावा यासाठी भाजपा काहीही करणार नाही, असंही शहांनी म्हटलं.

सत्तेमधील तीन पक्षांचा एकमेकांवर विश्वास असल्यास सरकार कसं काय पडू शकेल?, असा प्रश्न शहांनी उपस्थित केला. मात्र सरकारमधील काही जण नाराज असतील, तर मग हे सरकार कोण वाचवू शकेल? कोणीही वाचवू शकणार नाही, असं अतिशय सूचक भाष्य त्यांनी केलं.

भाजपा, राष्ट्रवादीमध्ये काही चर्चा सुरू आहे का, असा प्रश्न शहांना विचारण्यात आला. त्यावर शहांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारमधील अंतर्गत वादांचा मुद्दा उपस्थित केला. हे सरकार त्यांच्यात अंतर्गत वादांमुळे कोसळू शकेल, असं शहा म्हणाले.

तत्पूर्वी दोनच दिवसांपूर्वी अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर भाष्य केलं होतं. प्रत्येक राज्यातल्या सरकारनं, तिथल्या प्रशासनानं कोरोनाविरुद्धच्या लढाईत चांगलं काम केलं आहे, असं शहा म्हणाले होते.

देशातल्या प्रत्येक राज्यानं कोरोनाविरुद्ध संघर्ष केला आहे आणि अजूनही संघर्ष सुरूच आहे. या लढाईकडे आकड्याच्या दृष्टीकोनातून पाहायला नको. हे राज्य अपयशी ठरलं, ते यशस्वी झालं, असं आकडेवारी पाहून ठरवायला नको, असं शहांनी म्हटलं होतं.