आयुष्यभर भीक मागून जगला अन् त्याच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसमुदाय जमला; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 07:50 PM2021-11-17T19:50:11+5:302021-11-17T19:59:56+5:30

आज मोठमोठ्या इमारती, मोठ्या घरात राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काहीठिकाणी तर ४ लोकंही जमा होत नाहीत. पैसा असूनही जवळ माणसं नाहीत तर आयुष्यभरात काय कमावलं असं बोललं जातं. अशा समाजात आपण वावरत असताना कर्नाटकात घडलेल्या एका घटनेने विचार करण्यास भाग पाडलं आहे.

सध्याच्या काळात जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, एक व्यक्ती जो आयुष्यभर भीक मागून जगत होता. त्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंच्या संख्येने लोकं जमली होती. ठिकठिकाणी त्यांच्या अंत्ययात्रेवर फुलांचा वर्षाव होत होता. तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही.

पण ही घटना खरी आहे. कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यात हे सगळ्यांनी पाहिलं आहे. एका दिव्यांग भिकाऱ्याबद्दल शहरातील प्रत्येकाला वाटत असलेली आपुलकी यानिमित्तानं पाहायला मिळाली. या भिकाऱ्याने भीक मागून जीवन जगलं परंतु त्याच्या शेवटच्या प्रवासाला जाताना माणसांची प्रचंड गर्दी झाली.

ही गर्दी ना कुठल्या लालचेपोटी आली होती ना कुणी पैसे देऊन बोलावली होती. या भिकाऱ्याच्या अंत्ययात्रेत जाण्यासाठी कुणाला धमकीही देण्यात आली नव्हती. मग इतके लोक कसे जमले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?

ही गर्दी जमण्यामागचं कारण आहे ते म्हणजे या व्यक्तीनं प्रत्येकाच्या मनात एक जागा बनवली होती. ही गर्दी मानसिक रुग्ण असलेल्या भिकाऱ्यांच्या श्रद्धांजलीसाठी प्रार्थना करत होती. ज्यानं आयुष्यभर एक एक रुपया मागून जीवन काढलं त्याच्या अंत्ययात्रेसाठी सगळे जमले होते.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बल्लारी इथं ४५ वर्षीय बसवा याचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला. बसवाने आयुष्यभर लोकांकडे भीक मागितली पण त्याच्या मृत्यूनंतर इतक्या मोठ्या संख्येने लोकं जमलेली पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

बसवाचं भीक मागण्याची वेगळी स्टाईल होती. तो फक्त १ रुपया मागायचा आणि त्या बदल्यात लाखो कोट्यावधीचा आशीर्वाद द्यायचा. लोकं त्याला १ रुपयापेक्षा जास्त पैसे द्यायचे तेव्हा तो घ्यायचा नाही. लोकांनी आग्रह केला तरी तो हात जोडून पुढे निघून जायचा.

बसवानं दरवाजावर येऊन आपल्याकडे भीक मागावी असं प्रत्येकाला वाटायचं. कारण ज्याच्याकडे बसवा भीक मागायचा त्याच्यासाठी आयुष्यात अनेक शुभ संकेत घेऊन यायचा असं लोकं मानायची. त्यामुळे बसवाच्या आशीर्वादावर अनेक लोकांचा विश्वास बसत चालला.

काळांतराने बसवाच्या आशीर्वादामुळे लोकांची आयुष्य बदलली असं मानलं जाऊ लागल्याने दिवसेंदिवस लोकांचा विश्वास वाढू लागला. काळ बदलला पण विश्वास तुटला नाही. महागाई वाढली तरी बसवानं कुणाकडूनही १ रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेतली नाही.

बसवानं १-१ रुपया जोडून अनेक गरजवंताची मदत केली. त्यासाठी त्याने कधी चौकात बॅनर लावले नाहीत. ज्याला खरेच मदतीची गरज आहे अशा लोकांकडे स्वत: बसवा पोहचत होता. शुक्रवारी दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. बसवाच्या जाण्यानं अनेकांना धक्का बसला. कर्नाटकच्या बल्लारी आणि विजयनगरच्या प्रत्येक गावात, दुकानात, गल्ल्यांमध्ये बसवाची आठवण कायम लोकांच्या मनात कायम राहील.