Mental Health: अतिविचाराने मनातल्या मनात बड्बडण्याची सवय लागलीय का? मन:शांतीसाठी वापरा 'या' टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 03:42 PM2023-10-03T15:42:38+5:302023-10-03T15:47:24+5:30

Mental Health Care: ताण तणावाचे मुख्य कारण काय? तर अतिविचार! आणि अतिविचाराचा अतिरेक काय? तर झोपेतही बडबड करणं आणि झोपेतून उठल्याबरोबरही मनात विषयांची उलथापालथ सुरू असणं. असं मन शांत, स्थिर राहणार कसं? जोवर मन शांत नाही तोवर मेंदू शांत होणार नाही आणि जोवर मेंदू नीट काम करणार नाही तोवर कोणतेही काम नीट होणार नाही, असं हे दुष्टचक्र आहे. यावर तोडगा काढायलाच हवा!

शारीरिक थकवा आला तर एकवेळ विश्रांती घेऊन पुनश्च कामाचा श्रीगणेशा करता येतो, पण मानसिक थकव्याचे तसे नाही, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न कसे करायचे ते जाणून घेऊ.

दीर्घ श्वसन करण्यासाठी बसल्यावर लक्षात येते की दिवसभरात आपण आपल्या श्वासांनाही वेळ देत नाही. ते जलद गतीने सुरु असतात. पण जेव्हा आपण ते प्रयत्नपूर्वक घेतो, तेव्हा ते घेणं, थांबवणं आणि सोडणं या प्रक्रियेत श्वासांचं मोल कळतं. श्वास घेणं थांबवलं तर घुसमट होते. म्हणून दीर्घ श्वसन प्रक्रियेत श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वसन जेवढं दीर्घ करता येईल, तेवढं मन आपोआप शांत होत जाईल. पहाटे डोळे बंद करून ही क्रिया केली असता मनःस्वास्थ सुधारण्यास मदत होते, त्यालाच ध्यान लावणे किंवा मेडिटेशन करणे असं म्हणतात.

सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळजीमुळे होतात. मानसिक काळजी बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्या कारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते. बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, मानसिक चिंता संपते. शारीरिक आजार नाहीसे होतात.

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर तसेच संपूर्ण आयुष्य तणावमुक्त घालवण्यासाठी ध्यान कामी येते.

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी अति विचाराने जडतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी होते. त्यामुळे तुम्हीही ध्यान लावण्याची सवय लावून घ्या, फायद्यात राहाल.