Health Tips: ५१ व्या वर्षीही गौर गोपाल दास दिसतात फिट; काय असतो साधूंचा डाएट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:48 IST2025-06-11T16:44:05+5:302025-06-11T16:48:53+5:30

Health Tips: अध्यात्मिक गुरु असा लौकिक मिळालेले मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांच्याकडे पाहून, तुम्हाला जाणवणारही नाही की ते ५१ वर्षांचे आहेत. आपल्या वयापेक्षा १० वर्षं लहान दिसण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत नाहीत, तर त्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांचा फिटनेस आपोआप जपला जातो. कसा ते जाणून घेऊ.

स्क्रोलिंग न करता, इतर कोणतेही विचार न करता जेवताना फक्त जेवणाकडे आणि अन्न चावून खाण्याकडे लक्ष देणे, याला जेवणाचे मेडिटेशन असे ते संबोधतात. टीव्ही नाही, मोबाईल नाही, कोणाशी गप्पा नाहीत, फक्त तुम्ही आणि तुमचे जेवण! यामुळे तुम्ही अतिरिक्त जेवत नाही. पोटाला जेवढे लागेल तेवढेच जेवता. अन्न चावून खाल्ल्याने त्याचे पचन नीट होते आणि जेवण अंगी लागते.

सात्त्विक अन्न म्हणजे शुद्ध तुपाचा मारा केलेले जेवण नाही, तर असे अन्न जे खाताना तुम्हाला अपराधीपणा वाटणार नाही. थोडक्यात तेलकट, तुपकट, गोड, तिखट यांचा मारा नसलेले जेवण! ज्यात भाज्या, फळं, कडधान्य, भाकरी यांचा समावेश असतो.

जेवणासाठी २५-३० मिनिटे पुरेशी असतात असा त्यांचा नियम असतो. मुळात भुकेच्या ७५ टक्के जेवून २५ टक्के भाग रिकामा ठेवतात. त्यामुळे कमी अन्न पाण्याइतके पातळ होईपर्यंत चावून जेवतात आणि अर्ध्या तासात जेवण संपवतात.

अलीकडे वन पॉट मिल हा शब्द रुजू होत आहे. ही संकल्पना साधूंची! जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ते जेवत नाहीत तर शरीराला ऊर्जा मिळेल अशा बेताने ते जेवतात. मोह होऊ नये म्हणून एकदाच वाढून घेतात आणि घेतलेले अन्न संपवतात.

आपण काय खातोय, किती खातोय, पोटाची गरज किती आहे हे ओळखून खाणे याला 'माईंडफुल इटिंग' म्हणतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो.

जेवणाबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने हितकारी सवय म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर अर्थात सूर्योदयापूर्वी उठतात. पहाटे उठून आपले आन्हिक उरकणे, ध्यानधारणा करणे, व्यायाम करणे हा त्यांचा सकाळचा ठरलेला दिनक्रम असतो.

तुमचे डोळे आणि कानसुद्धा बऱ्याच गोष्टींचे सेवन करतात आणि डोक्यात सगळ्या गोष्टी साठवतात. तुम्ही जे पाहता, ऐकता यामुळे तुमचे भावविश्व तयार होते. मन:स्वास्थ्यासाठी त्यांनाही उपासाची गरज असते. त्यांना हानी पोहोचवणारे घटक त्यांच्यापासून दूर ठेवणे, याला म्हणतात मेंटल डाएट!

आपण घर आवरतो, कपाट आवरतो, तसे साधू मन आवरतात. हव्या असलेल्या गोष्टी राखून ठेवतात आणि नको असलेल्या मनातून काढून टाकतात. त्यामुळे मन शांत, स्थिर आणि एकाग्र राहण्यास मदत होते.

साधू जीवनशैलीत कोणतेही फॅन्सी डाएट नसते की क्रॅश डाएट नसते, पण रोजचा योगाभ्यास, व्यायाम, हिंडणे, फिरणे, क्रियाशील राहणे यात सातत्य असल्यामुळे त्यांचे वजन आटोक्यात राहते. अशी जीवनशैली आपल्यालाही अनुसरता येणे सहज शक्य आहे, गरज आहे ती एका निश्चयाची! तो निश्चय करता आला तर आपणही संसारात राहून तन, मन शांत ठेवून, फिटनेस देणारी साधू जीवनशैली आपल्या आचरणात आणू शकतो!