युद्ध जिंकणार! कोरोनासोबत जगताना भारतीयांना विषाणूंपासून वाचवणार 'या' ६ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 12:13 PM2020-06-08T12:13:44+5:302020-06-08T13:02:17+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान पसरलं आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी, लोकांचा व्हायरसपासून बचाव होण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं होतं. पण लॉकडाऊनमध्ये अनेक कामधंदे ठप्प पडली तसंच लोकांची कामंही रखडली आहेत. त्यामुळे आता २ महिन्यांनंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. अनलॉक 1.0 मध्ये अनेक धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल्स सुरू करण्यात आली आहेत. कोरोनासोबत जगत असताना भारतीयांनी काही नियमांचे स्वतःहून पालन केलं तर संसर्ग रोखता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला याबबत माहिती देणार आहोत.

मास्क : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केले जात आहे. अनलॉक करण्यात आले याचा अर्थ कोरोनाचा धोका टळला असा अजिबात नाही. कोरोना व्हायरसचं संक्रमण अजुनही वेगाने लोकांना होत आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर जाताना मास्कचा वापर करायला हवा. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास मास्कमुळे तुमची सुरक्षा होऊ शकते.

गॉगल्स: गेल्या काही दिवसात अमेरिकेतील संस्था आयकेयरकडून खुलासा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरस डोळ्यामार्फतही पसरू शकतो. संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यांमार्फत कोरोना व्हायरस पसरण्याची भीती असते. त्यामुळे सुरक्षितता बाळगण्यासाठी गॉगल्सचा वापर करायला हवा.

समर कॅप किंवा हॅट: कोरोना व्हायरस केसांमार्फत सुद्धा पसरू शकतो, ही बाब अनेक रिसर्चमधून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे संक्रमण पसरण्याची शक्यता वाढू शकते. यापासून बचाव करण्यासाठी समर कॅपचा वापर करा.

गरम पाणी: सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले. गरम पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो. साधी सर्दी असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही सतत आजारी पडण्यापासून वाचाल.

चहा : चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं बारीक करून घ्या आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं. त्यामुळे घश्याला शेक मिळून तुमची सर्दी, खोकल्याची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय १५ दिवस आवळ्यांचा रस नियमित प्यायल्यास शिंका येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

योगा: योगामुळे श्वासोच्छवास योग्य पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण गतिमान होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. त्यामुळे तुम्ही विषाणूंपासून लांब राहू शकता. तसंच नियमित योगा केल्याने मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते.