Sachin Vaze case: सचिन वाझेंनी कोणाच्या फायद्यासाठी स्फोटकांचा कट रचला?; नव्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 10:44 AM2021-03-17T10:44:05+5:302021-03-17T10:48:48+5:30

Antilia bomb scare, Sachin Vaze Case: सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, घटनास्थळावरील पुरावे नष्ट करणे, मनसुख हिरेनचा मृतदेह सापडणे, वाझेंचे त्याचाशी असलेले संबंध उघड होणे आदी समोर आल्याने अखेर सचिन वाझेंना अटक झाली. यानंतर खरी चर्चा सुरु झाली ती वाझेंनी असे का केले असावे....

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ 25 फेब्रुवारीला ठेवण्यात आली. यावेळी मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे हे त्यांच्या इनोव्हातून या स्कॉर्पिओच्या मागून चालले होते. (Sachin Vaze plotted expossive in sqorpio for self benifit)

सध्या वाझे एनआयएच्या कोठडीत असून वाझेंनीच हा कट रचल्याचा दावा एनआयएने केला आहे. या कटामागे कारण काय होते, कोणाला फायदा होणार होता यावर आता चर्चा होऊ लागली आहे.

विरोधकांनी सचिन वाझे हे प्रकरण उचलून धरल्याने महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. विधानसभा अधिवेशनावेळीच हा मुद्दा पेटला होता. यामध्ये शिवसेना नेत्यांचा हात आणि वरदहस्त असल्याचे आरोप झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील वाझेंची बाजू उचलली होती. गृहमंत्र्यांनी दोषींवर कारवाई होईल असे सांगितले होते. मात्र, नंतर एनआयएची या प्रकरणात एन्ट्री झाली आणि सारे पारडेच फिरले. तपासात वाझेच या कटाचे सूत्रधार असल्याचे समोर आले.

सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, घटनास्थळावरील पुरावे नष्ट करणे, मनसुख हिरेनचा मृतदेह सापडणे, वाझेंचे त्याचाशी असलेले संबंध उघड होणे आदी समोर आल्याने अखेर सचिन वाझेंना अटक झाली. यानंतर खरी चर्चा सुरु झाली ती वाझेंनी असे का केले असावे....

मुंबई निवडणूक डोक्य़ावर आहे, यामुळे शिवसेनेला देणग्यांसाठी फायदा व्हावा म्हणून वाझेंनी असे केले असावे असे आरोप करण्यात आले.

याचबरोबर अंबानींना हेलिकॉप्टर इमारतीवर उतरविण्याची परवानगी मिळत नाहीय, ती मिळविण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचे देखील दावे केले गेले.

एवढेच नाही तर वाझेंनीच स्वत:साठी अंबानींच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली कार लावल्याचा नवीन रिपोर्ट एका इंग्रजी वृत्तपत्राने दिला आहे.

सचिन वाझे हे एकेकाळचे खतरनाक एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. 2004 मध्ये ख्वाजा युनुस नावाच्या व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता, या प्रकरणात वाझे निलंबित झाले होते.

सुमारे १६ वर्षे ते अडगळीत टाकले गेले होते. शिवसेनेची सत्ता येताच 2020 मध्ये पुन्हा त्यांना पोलीस सेवेत घेण्यात आले. जुने दिवस, प्रसिद्धी आणि तेव्हाचा रुबाब परत मिळविण्यासाठी वाझेंनी हा कट रचल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.