Mansukh Hiren Case: बदललेला मास्क अन् घडी केलेले सहा रुमाल; मनसुख हिरन यांच्या पत्नीचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:21 PM2021-03-11T16:21:17+5:302021-03-11T17:13:08+5:30

Mansukh Hirens wife makes serious claims about death: मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल यांचा धक्कादायक दावा; एटीएसनं नोंदवला जबाब

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या घटनेचा तपास सुरू केला.

गुन्हे शाखेकडून तपास सुरू असताना स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात आढळून आला. हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानं घातपातची शंका बळावली.

मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे गेल्या अनेक महिन्यांपासून संपर्कात होते. वाझे काही महिन्यांपासून हिरेन यांच्या मालकीचीच गाडी वापरत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

हिरेन यांच्या पत्नी विमल यांनीदेखील महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) दिलेल्या जबाबात सचिन वाझेंवर संशय व्यक्त केला. पती मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

विमल हिरेन यांनी एटीएसला दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. मनसुख घरातून निघाले त्यावेळी त्यांनी घातलेला मास्क आणि त्यांचा मृतदेह ताब्यात घेतल्यावर त्या सोबत असलेला मास्क वेगळा असल्याची धक्कादायक माहिती विमल यांनी दिली.

मनसुख हिरेन घरून निघताना त्यांनी नाक आणि तोंड झाकलं जाईल, असा मास्क घातला होता. मात्र त्यांच्या मृतदेहासोबत असलेला मास्क पूर्ण चेहरा झाकला जाऊ शकेल असा होता, अशी माहिती विमल यांनी एटीएसला दिली.

यानंतर आता एटीएस कंपनीनं मास्क तयार करणाऱ्या संबंधित कंपनीशी संपर्क साधला. हिरेन यांच्या मृतदेहासोबत आढळलेल्या मास्कची विक्री नेमकी कुठून झाली, तो कोणी विकत घेतला, याची माहिती घेण्याचं काम एटीएसनं सुरू केलं आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या मास्कच्या आत सहा रुमाल घडी करून ठेवलेले होते, अशीदेखील माहिती विमल यांनी एटीएसला दिली. त्यामुळे प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे.

विमल हिरेन यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे एटीएस सचिन वाझेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ठाकरे सरकारनं वाझेंची गुन्हे शाखेतून बदली केली आहे.

सचिन वाझेंबद्दल विमल हिरेन यांनी संशय व्यक्त केला असताना आती राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनही (एनआयए) वाझेंची चौकशी होऊ शकते. एनआयए अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या गाडीचा तपास करत आहे. हा तपास आधी वाझेंकडेच होता. त्यामुळे वाझेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.