लग्नाला विरोध करत होता प्रेयसीचा अल्पवयीन भाऊ, मार्गातून हटवण्यासाठी प्रियकराने उचलले भयानक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 11:19 AM2021-06-04T11:19:29+5:302021-06-04T11:23:45+5:30

Crime News: पोलिसांनी हत्येच्या एका सनसनाटी घटनेचा उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या परिसरात झालेल्या १५ वर्षीय मुलाची हत्या त्याच्याच बहिणीच्या प्रियकराने केल्याचे पोलिसांनी या कारवाईनंतर सांगितले.

उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यामध्ये पोलिसांनी हत्येच्या एका सनसनाटी घटनेचा उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या परिसरात झालेल्या १५ वर्षीय मुलाची हत्या त्याच्याच बहिणीच्या प्रियकराने केल्याचे पोलिसांनी या कारवाईनंतर सांगितले. टॉवेलाने गळा आवळून आरोपीने या मुलाची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हत्येची ही घटना चांदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसेढा गावात घडली आहे. २६ मे रोजी आशिष सिंह या तरुणाचा मृतदेह झाडील पडलेला आढळला. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. तेव्हा पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. मृत तरुणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीकडे चौकशी करण्यात आली. तसेच गुप्तहेरांकडूनही माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली.

मृत आशिष हा त्याच्या मामाच्या मुलाच्या विवाहासाठी गेला होता. मात्र तिथून रात्रीच्यावेळी तो बेपत्ता झाला होता. खूप शोधाशोध केल्यानंतरही त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. त्यानंतर २५ मे रोजी आशिषच्या बहिणीने तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. अखेर २६ मे रोजी त्याचा मृतदेह गावाबाहेरील झाडीत सापडला होता.

जाफरगंजचे सीओ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मृत आशिष कुमार यांच्या बहिणीचे कानपूरमधील पतरसा गावात राहणाऱ्या विपूल उर्फ आवेशसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. दोघांचीही लग्न करण्याची इच्छा होती. मात्र या विवाहास प्रेयसीचा भाऊ आशिषचा विरोध होता. त्यामुळे तिचा प्रियकर असलेल्या विपुलने आशिषला वाटेतून बाजूला करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी संगितले की, मृत आशिष परसेढा गावात झालेल्या एका विवाहासाठी गेला होता. तिथे विपुलसुद्धा आला होता. तिथे संधी पाहून विपूलने त्याच्या प्रेयसीचा भाऊ आशिष याला जंगलात नेले. तिथे टॉवेलने गळा आवळून त्याने आशिषची हत्या केली. त्यानंतर मृतदेह झाडीमध्ये लपवून विपूल घटनास्थळावरून फरार झाला.

पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. आता त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. २४ मे रोजी आशिष आणि विपूल हे अन्य वऱ्हाड्यांसोबत आले होते. विपूल हा मृत आशिषच्या बहिणीवर प्रेम करत होता. त्याला मृताची आई आणि मृताकडूवन विरोध होत होता.

पोलिसांनी सांगितले की, वरातीमध्येच मृत आशिष आणि विपूलमध्ये कुठल्यातरी कारणावरून विवाद झाला. त्यानंतर विपुलने आशिषला शौचास जाण्याचा बहाणा बनवून शेतामध्ये नेले. तिथे त्याने आशिषचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडीत लपवला. आरोपीची सखोल चौकशी असता त्याने हत्येची कबुली दिली.