TATA चा इफेक्ट? Air India च्या कर्मचाऱ्यांना २०१७ नंतर पहिल्यांदा वेळेत पगार आला! जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:18 PM2021-10-06T18:18:49+5:302021-10-06T18:25:20+5:30

तोट्यात असलेल्या Air India च्या खरेदीसाठी TATA ग्रुपची बोली सर्वश्रेष्ठ ठरली आहे.

सरकारी मालकी असलेल्या Air India च्या खासगीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. Air India वर आताच्या घडीला सुमारे ६० हजार कोटींचे कर्ज आहे. तरीही TATA ग्रुप एअर इंडिया खरेदी करण्यासाठी खूपच उत्सुक आहे.

तोट्यात असलेल्या Air India च्या खरेदीसाठी TATA ग्रुपची बोली सर्वश्रेष्ठ ठरली असून, समाजमाध्यमांवर मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या या निर्णयाला सरकारने अद्याप अधिकृतपणे दुजोरा मात्र दिलेला नाही. असे असले तरी याचा सकारात्मक परिणाम एअर इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आतापासूनच दिसू लागले असल्याचे सांगितले जात आहे.

सन २०१७ नंतर पहिल्यांदाच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी पगार देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना अनियमित वेतनाचा फटका बसला असतानाच हा नवीन TATA इफेक्ट त्यांना सुखद धक्का देणार आहे, असे म्हटले जात आहे.

Air India मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराला कायमच प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. आम्हाला या कंपनी अंतर्गत विषयावर फार काही बोलायचे नाही, असे द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कंपनीने म्हटले आहे. सरकार एअर इंडियामधील १०० टक्के हिस्सेदारी विकण्याच्या तयारी आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीबरोबरच या कंपनीचे काम पाहणाऱ्या एआयएसएटीएसमधील हिस्सेदारीही सरकार विकणार आहे.

याच प्रकारे कंपनीने पीएफ खात्यांवरील रक्कम वळवण्यासाठी लागणारा खर्च स्वत: उचलणार असल्याचाही निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने हा खर्च कर्मचाऱ्यांना करावा लागेल, असे म्हटले होते. मात्र, या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. याला हवे तर TATA इफेक्ट म्हणून शकता. मात्र, आम्हाला आमच्या वेतनातील बेसिक सॅलरी यंदा एक तारखेलाच मिळाली.

सन २०१७ पासून कंपनीत काम करतो आहे. पण हे असे पहिल्यांदाच घडले आहे, असे एका कर्मचाऱ्याने म्हटले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या Air India कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला जात नव्हता. सन २०१७ पासून पहिल्या आठवड्यानंतर किंवा १० तारखेच्या आसपास पगार दिला जायचा.

Air India च्या खरेदीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी सर्वाधिक बोली लावणारी TATA सन्स या स्पर्धेत आघाडीवर आहे. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली आहे. अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने TATA च्या बोलीसंदर्भात निर्णय घेणार आहेत, असे सांगितले जात आहे.

निर्धारित राखीव किमतीच्या आधारावर वित्तीय निविदांद्वारे लावण्यात आलेल्या बोलीचे मू्ल्यमापन करण्यात आले असून, सर्वाधिक बोली TATA सन्सकडून आल्याचे सांगितले जात आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणुकीसाठी स्थापन केलेल्या सचिवस्तरीय समितीकडून तपासणीही पूर्ण झाली आहे.

Air India मधील १०० टक्के भागभांडवल विकण्याची प्रक्रिया केंद्राने जानेवारी २०२० पासून सुरू केली होती. याशिवाय, तिच्या उपकंपन्या म्हणजेच एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट्स सव्‍‌र्हिसेस प्रा.लि.मधील ५० टक्के हिस्सा विकण्याचे सरकारने प्रस्तावित केले.

मात्र कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेस विलंब झाला. नंतर एप्रिल २०२१ मध्ये सरकारने उत्सुक कंपन्यांना पुन्हा वित्तीय बोली लावण्यास सांगितले. बोली लावण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली गेली होती.

Air India वरील एकूण थकीत कर्ज ३१ मार्च २०१९ अखेर ६० हजार ०७४ कोटी रुपये आहे. खरेदीदाराकडून यापैकी २३ हजार २८६ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचा भार उचलला जाणार आहे. २००७ पासून ही कंपनी तोट्यात आहे.

Air India ची मालकी TATA कडे गेल्यास त्या उद्योग समूहाला त्यांनीच स्थापलेल्या या हवाई सेवेची मालकी ६७ वर्षांनंतर पुन्हा मिळणार आहे.

जेआरडी टाटा यांनी १९३२ साली टाटा एअरलाइन्स या नावाने स्थापन केलेल्या या कंपनीचे, पुढे १९४६ मध्ये Air India असे नामकरण केले गेले. सन १९४८ मध्ये ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ने युरोपसाठी उड्डाणेही सुरू केली. मात्र, १९५३ मध्ये सरकारने Air India वर ताबा घेऊन तिचे राष्ट्रीयीकरण केले.