RBI New Rule Credit Card Close: आरबीआयचा बुलडोझर! आता क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला दर दिवशी ५०० रुपये देणार; नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 04:19 PM2022-04-22T16:19:49+5:302022-04-22T16:25:19+5:30

RBI New Rule Credit Card Close Request: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बळजबरीने कर्ज वसुली करणाऱ्या बँकांना आणि वित्तीय संस्थांविरोधात बडगा उगारलेला असताना आता क्रेडिट कार्ड सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना, बँकांवर बुलडोझरच चालविला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बळजबरीने कर्ज वसुली करणाऱ्या बँकांना आणि वित्तीय संस्थांविरोधात बडगा उगारलेला असताना आता क्रेडिट कार्ड सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना, बँकांवर बुलडोझरच चालविला आहे. याद्वारे आता ग्राहकांना क्रेडिट कार्ड बंद करणे सोपे झाले असून सात दिवसांच्या मुदतीत तसे न केल्यास त्या बँकांना दिवसाला ५०० रुपये हे ग्राहकाला द्यावे लागणार आहेत.

आरबीआय डायरेक्शन्स, २०२२ (क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड- इश्यूअंस अँड कंडक्ट) जारी केला आहे. हा नियम १ जुलै २०२२ पासून लागू होणार आहे. हे नवे नियम भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्वच शेड्युल्ड बँक (यामध्ये पेमेंट बँक, स्टेट को ऑपरेटीव्ह बँका आणि जिल्हा बँकावगळून) ना लागू होणार आहेत.

यानुसार जर एखादी कंपनी किंवा बँक तुमचे क्रेडिट कार्ड बंद करण्यास वेळकाढूपणा करत असेल तर त्या बँका कार्ड होल्डरला दिवसाला ५०० रुपयांचा दंड स्वरुपात भरपाई देणार आहेत.

आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जर क्रेडिट कार्डधारकाने सर्व थकबाकी भरली असेल, तर क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या विनंतीवर सात दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया करावी लागेल.

क्रेडिट कार्ड बंद झाल्याबद्दल कार्डधारकाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे त्वरित कळवावे लागणार आहे.

कंपन्या कार्डधारकांना पोस्ट किंवा अन्य मार्गाने बंद करण्याची विनंती करण्यास भाग पाडू शकत नाहीत. यामुळे विनंती अर्ज पोहोचण्यास विलंब होऊ शकतो.

जर कार्ड जारी करणारी कंपनी किंवा बँकेने सात कामकाजाच्या दिवसांत क्रेडिट कार्ड बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना खाते बंद होईपर्यंत दररोज 500 रुपये दंड भरावा लागेल.

क्रेडिट कार्ड एका वर्षापेक्षा जास्त काळ वापरत नसल्यास, क्रेडिट कार्ड जारीकर्ता कार्डधारकाला कळवल्यानंतर क्रेडिट कार्ड खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतो. हा जुना नियम आहे.

कार्डधारकाने 30 दिवसांच्या आत प्रतिसाद न दिल्यास आणि सर्व बिले भरलेली असल्यास कार्ड जारीकर्ता कार्ड बंद करू शकतो. कंपनीने कार्ड बंद झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत क्रेडिट माहिती ठेवणाऱ्या कंपनीला याची सूचना द्यावी.

क्रेडिट कार्ड खाते बंद करताना, क्रेडिट कार्ड खात्यात काही पैसे शिल्लक असल्यास ते कार्डधारकाच्या बँक खात्यात टाकावे लागतात.