Gautam Adani: “पुढील दोन दशकांत भारतीय अर्थव्यवस्था १५ ट्रिलियन डॉलरवर जाईल”: गौतम अदानी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 08:14 PM2021-07-12T20:14:00+5:302021-07-12T20:19:59+5:30

Gautam Adani: भारतीय अर्थव्यवस्था १५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची गरूडभरारी घेईल, असा दावा गौतम अदानी यांनी केला.

नवी दिल्ली: अदानी समूहाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी कंपनीची वाटचाल, ध्येयधोरणे, अचिव्हमेंट्स याबाबत भागधारक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. (Gautam Adani)

यावेळी बोलताना गौतम अदानी यांनी अदानी समूह, त्यातील कर्मचारी, कोरोनाचे संकट, भारतीय अर्थव्यवस्था, भविष्यातील धोरणे, योजना यांवर अगदी सविस्तर भाष्य केले.

पुढील काही कालावधीत भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच पार करेल. एवढेच नव्हे, तर पुढील दोन दशकांमध्ये जागतिक स्तरावरील एक मोठी बाजारपेठ म्हणून भारत उदयाला येईल. (india can become 15 trn dollar economy)

यासह भारतीय अर्थव्यवस्था १५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची गरूडभरारी घेईल, असा दावा गौतम अदानी यांनी यावेळी बोलताना केला. मात्र, हा प्रवास सोपा नसेल. यात अनेकविध अडचणी येतील.

तरीही देशातील मध्यम वर्गाची वाढलेली संख्या, कामकाजाच्या वयात वाढ आणि जनसंख्येची कामासाठी झालेली वृद्धी याचा सकारात्मक प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, असे गौतम अदानी यांनी म्हटले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेसह मार्केट कॅपचे मूल्यही मोठ्या प्रमाणात वाढेल. २०२१ या आर्थिक वर्षासाठी सूचिबद्ध कंपन्यांचे व्याज, कर, घसारा आणि परिशोधन (अमोर्टिझशन) एकत्रित उत्पन्न हे ३२,००० कोटी इतके होते, मागील आर्थिक वर्षापेक्षा २२% वाढ या कंपन्यांनी उत्पन्नात नोंदवली.

अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या समभागांनी १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला. जवळपास ९ हजार ५०० कोटी रुपयाचा परतावा समभागधारकांना देण्यात आला. कंपन्यांचा करोत्तर नफा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १६६ टक्क्यांनी वाढली, असेही अदानी म्हणाले.

अदानी ग्रुपच्या शेअर बाजारातील सर्व लिस्टेड कंपन्या उत्तम कामगिरी करत आहे. अदानी समूहाचे मार्केट कॅपिटल १०० अब्ज डॉलरवर गेले आहे. कंपनी अशीच प्रगती करत राहील आणि नवीन यशोशिखर गाठेल, असा विश्वास गौतम अदानी यांनी यावेळी व्यक्त केला.

देशातील प्रत्येक चार प्रवाशांपैकी एक प्रवासी अदानी विमानतळाचा वापर करत प्रवास आणि उड्डाण करतो. जगातील कोणत्याही देशात एखाद्या विमानतळ कंपनीने एकूण प्रवासी वाहतुकीपैकी २५ टक्के हिस्सा मिळवलेला नाही.

अदानी एन्टरप्राइजेस या कंपनीमार्फत समूहाने विमानतळ विकास या क्षेत्रात पाउल ठेवल्याचे अदानी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. अदानी समूहाने अलीकडेच अनेक विमानतळांवरील कामकाज सुरू केले असून, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाचा ताबा मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे गौतम अदानी यांनी म्हटले आहे.

कंपनीकडून संपूर्ण भारतभर विमानतळाचे जाळे उभारण्याबरोबरच, प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्प्नशिवाय इतर स्रोतातून उत्त्पन्न मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधून निर्माण होणाऱ्या शक्यता सुद्धा कंपनीकडून तपासून पहिल्या जात आहेत.

आताच्या घडीला अदानी समूह बंदर, विमानतळ, लॉजिस्टिक, नैसर्गिक संसाधने, औष्णिक आणि अपारंपरिक वीज उत्पादन, पारेषण, वितरण, डेटा सेंटर, संरक्षण, बांधकाम, शहरी वायू वितरण आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत आहे.

Read in English