अंबानींची 'एनर्जी' वाढणार!, धाकट्याचं काम पाहून मुकेश अंबानी भारावले, सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 09:35 AM2022-08-31T09:35:50+5:302022-08-31T09:49:24+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांच्या तीन मुलांमध्ये व्यवसाय विभागला आहे. त्यांनी RIL च्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सांगितले की रिटेल, टेलिकॉम मोठा मुलगा आकाश अंबानीकडे आणि एनर्जी व्यवसाय लहान मुलगा अनंत अंबानीकडे सोपवण्यात आला आहे. ही माहिती देताना, मुकेश अंबानी यांनी धाकट्या मुलाचे म्हणजेच अनंत अंबानींचे तोंडभरुन कौतुक केले. मुलानं अतिशय गांभीर्यानं बिझनेसची जबाबदारी स्वीकारली आणि तो करत असलेल्या कामानं भारावून गेल्याचं ते म्हणाले.

मुकेश अंबानींनी अनंत अंबानींचं कौतुक केलं. अनंत एनर्जी क्षेत्राच्या व्यवसायात खूप रस घेत आहे आणि भविष्याबद्दल खूप उत्सुक असल्याचे ते म्हणाले. अनंत अंबानी हे तेच आहेत ज्यांनी लठ्ठपणाच्या समस्येवर मात करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यावरून त्यांची इच्छाशक्ती आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा दिसून येते. यामुळेच ज्या क्षेत्राकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे त्या एनर्जी सेक्टरचा व्यवसाय अनंत अंबांनीकडे सोपवण्यात आला आहे. भारताचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हरित ऊर्जेवर जास्त भर देत आहेत. फक्त हरित ऊर्जेलाच स्वच्छ ऊर्जा आणि अक्षय उर्जा क्षेत्राकडे एकत्रितरित्या पाहिलं जाऊ शकतं. भविष्यात या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत.

अनंत अंबानी यांना दम्याचा त्रास आहे. याच्या उपचारात दिलेल्या औषधांमुळे त्यांचं वजन झपाट्यानं वाढलं. एक काळ असा होता जेव्हा अनंत अंबानी एका जपानी सुमो कुस्तीपटूसारखे दिसत होते, पण त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचा परिणाम पाहा आज ते पूर्णपणे स्लिम-ट्रिम झाले आहेत. त्यांनी इतकं शिस्तबद्ध जीवन जगलं की अवघ्या १८ महिन्यांत १०८ किलो वजन कमी करुन दाखवलं. त्यासाठी ते दररोज २१ किमी चालत असत. त्यांनी वजन कमी करण्याचं प्रशिक्षण घेतलं, अत्यंत कठोर कार्डिओ व्यायाम आणि योगासनं केली.

त्याच वेळी, त्यांनी अन्नाबाबत बरीच खबरदारी देखील घेतली आणि गोड, जास्त कार्बोहायड्रेट असलेले अन्न खाणं टाळलं. अनंत अंबानी यांना प्राण्यांची खूप आवड आहे. त्यांना पाळीव आणि वन्य प्राण्यांबद्दल भरपूर माहिती आहे. अनंत अंबानी अतिशय आध्यात्मिक व्यक्ती आहेत. त्यांची भगवान बालाजीवर नितांत श्रद्धा आहे. तिरुमला येथील व्यंकटेश्वर मंदिरातही ते आवर्जुन भेट देत असतात. त्यांनी बालाजीला पवित्र पांढरा हत्तीही दान केला आहे.

रिलायन्स समूहाचे प्रामुख्याने तीन मोठे व्यवसाय आहेत - पहिला तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स, दुसरा रिटेल आणि तिसरा डिजिटल सेवा ज्यात टेलिकॉम देखील समाविष्ट आहे. किरकोळ व्यवसायासाठी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) तर डिजिटल सेवांसाठी Jio Platforms Limited (JPL) तयार करण्यात आली आहे. तिन्ही व्यवसाय आकाराने जवळपास समान आहेत. आकाश आणि ईशा अनुक्रमे दूरसंचार आणि रिटेलचे काम पाहतात, तर अनंतला अक्षय ऊर्जा कंपनीत संचालक बनवण्यात आले आहे. कंपनीचे लक्ष सध्याच्या आणि नवीन व्हॅल्यू चेनचा विस्तार करण्यावर आहे. अनंतला नुकतेच RRVL मध्ये संचालक पद मिळाले आहे. मे 2020 पासून ते Jio Platforms Limited (JPL) चे संचालक होते. आकाश आणि ईशा ऑक्टोबर 2014 पासून RRVL च्या बोर्डावर होते.

रिलायन्स इंडस्ट्रीजने ग्रीन एनर्जी व्यवसायात पुढील तीन वर्षांत 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या आणि नवीन व्हॅल्यू चेनचा विस्तार करण्यावर कंपनीचा भर आहे. यासाठी अंबानी यांनी जामनगरमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर सिस्टिमचा नवीन कारखाना सुरू करण्याची घोषणा केली आहे. 2023 पर्यंत बॅटरी पॅकचे उत्पादन सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर ते पहिल्या वर्षी 2024 पर्यंत 5 GHz आणि 2027 पर्यंत 50 GHz केले जाईल.

कंपनीने म्हटले आहे की 2024 पर्यंत 10 वॅटचा सौर फोटोव्होल्टेईक सेल कारखाना देखील स्थापित केला जाईल. रिलायन्स 2025 पर्यंत ग्रे हायड्रोजनवरून ग्रीन हायड्रोजनकडे जाईल. ऊर्जा व्यवसायात सौर, बॅटरी आणि हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक समाविष्ट आहे. रिलायन्सने अत्यंत महागड्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्राकडे जोरदार वाटचाल केली आहे. पुढील दशकापर्यंत कंपनी हरित ऊर्जेच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करेल असा अंदाज आहे.

रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मुकेश अंबानी यांनी सांगितले की त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी न्यू एनर्जीच्या व्यवसायात खूप रस घेत आहे. तो आपल्या जबाबदारीबद्दल किती जागरूक आहे, याचा अंदाज तो जामनगरमध्ये जास्त वेळ घालवतो यावरून लावता येतो. कंपनीची गुजरातमधील जामनगर येथे तेल शुद्धीकरण कारखाना आहे. रिलायन्सच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख व्यवसाय तेल आणि रसायने आहेत, ज्यामुळे संपूर्ण कंपनी समूहाला (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)100 बिलियन डॉलर इतका महसूल मिळतो. जिओ आणि रिटेल हे देखील खूप मोठे व्यवसाय आहेत. या आर्थिक वर्षाच्या आर्थिक निकालांमध्ये या दोन्ही स्वतंत्र कंपन्या म्हणून सादर करण्यात आल्या.

आकाश अंबानींची या वर्षी जूनमध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली होती. मात्र, ईशा आणि अनंतसाठी अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. आकाश, ईशा आणि अनंत हे दूरसंचार, किरकोळ आणि ऊर्जा व्यवसायाच्या संचालक मंडळावर आहेत, परंतु मूळ कंपनीपैकी एकही RIL च्या संचालक मंडळावर ते नाहीत. मुकेश अंबानी म्हणाले, 'तिघेही आमच्या संस्थापक (धीरूभाई अंबानींसारखे) विचार करतात. तिघांचाही व्यावसायिक दृष्टीकोन विलक्षण आहे. ही टीम रिलायन्समध्ये उत्तम काम करत आहे. या तिघांनाही मी आणि मंडळाच्या संचालकांसह आमचे वरिष्ठ अधिकारी दररोज शिकवत आहेत. अनंतसाठी दुबईत एक आलिशान घर विकत घेण्यात आले, ज्याची किंमत 80 दशलक्ष डॉलर (सुमारे 640 कोटी रुपये) आहे. पाम जुमेराची ही मालमत्ता यावर्षी खरेदी करण्यात आली आहे.

वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी 2002 मध्ये RIL चे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांनी डिसेंबर 2021 मध्ये प्रथम उत्तराधिकार योजनेवर चर्चा केली. मग ते म्हणाले की, नवीन पिढी व्यावसायिक साम्राज्य काबीज करण्यास तयार आहे. रिलायन्सची स्थापना 1973 मध्ये धीरजलाल हिराचंद अंबानी म्हणजेच धीरूभाई अंबानी यांनी केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने कापडापासून ते तेल आणि दूरसंचार क्षेत्रापर्यंत विस्तार केला. पण 2002 मध्ये त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबात फूट पडली.

मुकेश अंबानी आणि धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यात मतभेद निर्माण होऊ लागले. तीन वर्षांच्या कटु संबंधानंतर आई कोकिलाबेन यांनी २००५ मध्ये रिलायन्सची संपत्ती वाटून घेतली. मुकेश यांना रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स, तेल आणि वायू आणि कापड व्यवसाय देण्यात आले, तर अनिल यांच्या वाट्याला दूरसंचार, मालमत्ता व्यवस्थापन, मनोरंजन आणि वीज निर्मिती व्यवसाय देण्यात आले. अनिल अंबानींच्या साम्राज्याचे विघटन होत असताना मुकेश अंबानी यांनी कालांतराने आपला व्यवसाय मजबूत केला आणि वाढवला.