Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 08:53 AM2021-08-04T08:53:16+5:302021-08-04T09:02:32+5:30

Adani Group ने कोळसा उद्योगात आपली मजबूत दावेदारी सादर केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून Adani Group सर्वाधिक चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील लिस्टेड कंपनींचा उच्चांक आणि एका वृत्तामुळे खाल्लेली जोरदार आपटी यामुळे अदानी ग्रुप आणि गौतम अदानी यांची देशभरात चर्चा होती.

यानंतर मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाचे संचालन Adani Group च्या ताब्यात आल्यानंतर तेथे लावलेले नामफलक शिवसैनिकांकडून उखडून टाकण्यात आले. यामुळेही अदानी ग्रुप पुन्हा चर्चेत आला आहे.

अलीकडील काळात Adani Group वेगवेगळ्या क्षेत्रात आगेकूच करताना पाहायला मिळत असून, आता अदानी समूहाने कोळसा उद्योगात आपली मजबूत दावेदारी सादर केली आहे. कोळसा खाण लिलावात सर्वाधिक बोली लावत अदानी समूहाने महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील कोळसा खाणींचा ताबा घेतला आहे.

केंद्र सरकारने कोळसा खाणींचा ऑनलाइन लिलाव आयोजित केला असून, सोमवारी तीन कोळसा खाणींचे लिलाव झाले. यानंतर पाच खाण पट्ट्यांचे लिलाव होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी झालेल्या लिलावात अदानी समूहातील अदानी पॉवर या कंपनीने महाराष्ट्रातील गोंदखरी कोळसा खाणीसाठी बोलीच्या ९.५ टक्के अधिक किंमत मोजून ही खाण ताब्यात घेतली. गोंदखरी कोळसा खाणीची वार्षिक उत्पादन क्षमता ९८.७१ दशलक्ष टन इतकी आहे.

या खाणीच्या लिलावात सनफ्लॅग आर्यन अँड स्टील ही कंपनीही स्पर्धेत होती. मात्र, अदानी समूहाची बोलीमध्ये सरशी झाली. तसेच छत्तीसगडमधील झिगादोर खाणीच्या लिलावात अदानी समूहातील सीजी नॅचरल रोसिरस लिमिटेड या कंपनीने बाजी मारली. झिगादोर खाणीमध्ये जवळपास २५ दशलक्ष टन कोळसा साठा असल्याचे बोलले जाते.

कोळसा खाणींचा लिलावाचा दुसरा टप्पा २५ मार्चपासून सुरु झाला होता. यामध्ये छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील खाण पट्टे लिलाव केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात १९ खाण पट्टे लिलावात देण्यात आले. ज्यासाठी ३४ निविदा प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये राखीव किमतीच्या ९.५ टक्के ते ६६.७५ टक्के अधिक बोली प्राप्त झाली. सरकारला जवळपास ७ हजार कोटींचा महसूल मिळाला.

दरम्यान, देशातील प्रमुख विमानतळांचे व्यवस्थापन खासगी क्षेत्राच्या ताब्यात देण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये निविदा मागवल्या होत्या. अदानी समुहाकडे या विमानतळांचे व्यवस्थापन पाहण्याचा ५० वर्षांचा ठेका आहे.

अहमदाबाद, लखनौ, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममधील विमानतळांच्या व्यवस्थापनाचा ठेका अदानी समुहाला मिळाला होता. एअरपोर्ट व्यवस्थापन सेक्टरमध्ये जीएमआरसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याची मक्तेदारी मोडीत काढत अदानी समुहाने हा ठेका मिळवला होता.