Solar Eclipse 2022: ऐन दिवाळीत सूर्यग्रहण: ‘या’ ६ राशींना सतर्कतेचा सल्ला; अखंड सावधान राहावे; संमिश्र कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 02:15 PM2022-09-30T14:15:38+5:302022-09-30T14:23:56+5:30

Solar Eclipse 2022: यंदा भारतात दिसणारे हे पहिले सूर्यग्रहण ऑक्टोबरमध्ये लागणार असून, काही राशींवर याचा प्रतिकूल प्रभाव दिसू शकेल. जाणून घेऊया...

सन २०२२ मधील दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात लागणार आहे. भारतात दिसणारे हे पहिले सूर्यग्रहण असणार असून, ऐन दिवाळीत हे खंडग्रास पद्धतीने सूर्यग्रहण दिसेल. २५ ऑक्टोबर रोजी हे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. (solar eclipse october 2022)

हे सूर्यग्रहण तूळ राशीत होणार असून, ग्रहणाचा कालावधी ४ तास ३ मिनिटे असणार आहे. या सूर्यग्रहणाचा तूळ राशीच्या व्यक्तींवर अधिक दिसू शकेल. आताच्या घडीला तूळ राशीच्या व्यक्तींवर शनीचा ढिय्या प्रभाव आहे. तूळ राशीसह सूर्यग्रहणाचा अन्य ५ राशींच्या व्यक्तींवर संमिश्र प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे. (surya grahan october 2022)

या सूर्यग्रहणाचा मोक्ष भारतात दिसणार नाही, असे सांगितले जात आहे. सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर प्रतिकूल प्रभाव पाहायला मिळू शकेल. सूर्यग्रहणात काय काळजी घ्यावी. या कालावधीत कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतील, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना दिवाळीतील सूर्यग्रहण संमिश्र ठरू शकेल. सूर्यग्रहणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटू शकते. तुम्‍हाला जी काही चिंता आहे, ती तुम्‍ही कोणाशीही शेअर करू शकणार नाही, असे म्हटले जात आहे.

मिथुन राशीच्या व्यक्तींना दिवाळीत लागणारे खंडग्रास सूर्यग्रहण संमिश्र ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या बजेटची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात तुमचा खर्च वाढू शकेल. मात्र, मिळकत तेवढी होईलच असे नाही. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे उपयुक्त ठरू शकेल. अन्यथा दिलेली वेळ पाळणे कठीण होऊ शकेल. प्रत्येक काम करण्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत आणि परिश्रम दुप्पट करावे लागतील.

कन्या राशीच्या व्यक्तींना दिवाळीत लागणारे खंडग्रास सूर्यग्रहण संमिश्र ठरू शकेल. आर्थिक स्थितीवर प्रतिकूल प्रभाव पाहायला मिळू शकेल. या काळात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैसे गुंतवण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. शक्य असल्यास पैसे गुंतवणे टाळा. तसेच प्रत्येक काम करण्यापूर्वी तुमचे बजेट तयार करा.

तूळ राशीच्या व्यक्तींनाही सूर्यग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव पाहू शकेल. याच राशीत सूर्यग्रहण लागणार असल्याने त्याचा प्रभाव दिसून येऊ शकेल. या कालावधीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. वाहन चालवताना अधिक सतर्क राहण्याची तसेच वेगावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. शक्य असल्यास प्रवास टाळावेत, असे सांगितले जात आहे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दिवाळीत लागणारे खंडग्रास सूर्यग्रहण संमिश्र ठरू शकेल. आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होईल. तुमचे पैसे बुडण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या काळात केलेली गुंतवणुकीतून तोटा होऊ शकेल. शक्यतो गुंतवणूक करणे टाळा.

मकर राशीच्या व्यक्तींना दिवाळीत लागणारे खंडग्रास सूर्यग्रहण संमिश्र ठरू शकेल. सूर्यग्रहणात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्याच्या बाबतीतील निष्काळजीपणा नुकसानकारक ठरू शकतो. एखादी अनामिक भीती सतावू शकते. संयम आणि शांततेने कार्य करावे, असे सांगितले जात आहे.

सूर्यग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. ग्रहणानंतर लगेचच गहू, गूळ, मसूर, तांबे या गोष्टींचे दान करणे तुमच्यासाठी शुभ ठरू शकेल. याशिवाय आदित्य हृदयस्तोत्राचे पठण करू शकता. यासोबतच गुरुमंत्राचा जप करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.