Janmashtami 2022 : 'या' पाच गोष्टी आपल्यालाही आयुष्यात उतरवता आल्या तर जीवन कृष्णमय होईल हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 01:01 PM2022-08-18T13:01:15+5:302022-08-18T13:04:37+5:30

Janmashtami 2022: आज गोकुळाष्टमी. हा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. परंतु उत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून बोध घेण्यासाठी देखील असतो. गोपाळकाल्याचा उत्सव हा कृष्ण चरित्रातून बोध घेण्यासाठी आहे. परंतु आपण कृष्णकथेतला भाग सोयीस्कररीत्या वापरतो. तसे करणे योग्य नसून कृष्णाशी समरसून जायचे असेल तर कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंश आपल्यात उतरवून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठीच भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य चरित्रातून आत्मसात करण्यासारख्या पाच गोष्टी!

भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम होता. त्याचे अलौकिक गुण हेच त्याचे अलौकिक नेतृत्त्व होते. तो असाधारण नेता होता. श्रीकृष्णाचा लहानात लहान मित्रांशी, विद्वानांशी किंवा अधिकाऱ्यांशी सारखाच प्रेमभाव होता. त्याच्या अप्रतिम नेतृत्त्वाचे मूळ होते, त्याचा अपूर्व स्वार्थत्याग. म्हणूनच लोकांचा त्याच्यावर अक्षय विश्वास होता.

तत्वज्ञान व व्यावहारिक दक्षता यांचा श्रेष्ठ दर्जाचा संग दुसऱ्या कुठेही पहायला मिळत नाही. या नियमाला अपवाद म्हणजे श्रीकृष्ण आणि त्याने सांगितलेली भगवद्गीता कृष्णाकडे योग्य अयोग्यतेच्या बाबतीत त्वरित निर्णय घेण्याची अलौकिक शक्ती होती. इंद्रिय निग्रह होता व स्थितप्रज्ञता होती.

कृष्ण महान असूनही त्याच्या ठायी कमालीची विनम्रता होती. राजसूय यज्ञाच्या वेळी अतिथींचे चरण धुण्याचे आणि उष्ट्या पत्रावळी उचलण्याचे काम त्याने केले. मानवतेसाठी त्याने आपले आयुष्य वाहिले होते. एवढी युद्धे केली पण स्वतःसाठी काही घेतले नाही. कृष्ण निष्काम कर्म मानणारा होता.

श्रीकृष्णाने केवळ सत्तारूढ व दुष्ट शासकांचाच वध केला होता. कारण ते संस्काराने सुधारत नाहीत किंवा कुणाचे काही ऐकायला तयार होत नाहीत. त्यांची जातकुळीच वेगळी असते. कंस, शिशुपाल यांच्याव्यतिरिक्त त्याने कोणावर सुदर्शन चक्र चालवले नाही.

श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व दिव्य होती. साधूता आणि सज्जनता यांची साक्षात तो मूर्ती होता. श्रीकृष्णाचे तत्वज्ञान मानवजातीला मिळालेली अप्रतिम भेट आहे.