Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 11:25 IST2025-07-05T10:49:27+5:302025-07-05T11:25:04+5:30
Ashadhi Ekadashi 2025 Wishes in Marathi: आषाढी एकादशीची वारी एकदा तरी आयुष्यात अनुभवावी असे प्रत्येक भाविकाला वाटते. मात्र नोकरी, व्यवसाय, प्रपंच यामुळे सर्वांनाच ते शक्य होत नाही. पण म्हणतात ना, 'काम असावा ईश्वर!' आपले नेहमीचे काम वारंवार करणे, सातत्याने करणे ही देखील वारीच! ६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. या मानसवारीत पुढील शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या प्रियजनांनाही सामावून घ्या!

आषाढी एकादशी मराठी शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरंगात न्हाऊन निघतो. त्याचे श्रेय जाते संतांना! ज्यांनी विठूरायाचे सुंदर अभंग लिहून त्याच्या सगुण रूपाची प्रचिती आपल्याला शब्दातून दिली. आषाढीनिमित्त त्याचीच उजळणी शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून करूया.
अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥
संत चोखामेळा यांचा हा अभंग आहे. त्यात ते भक्तांच्या रंगात रंगून गेलेल्या पांडुरंगाचे वर्णन करत आहेत. हे वर्णन एवढे चित्रमय आहे की आपल्या डोळ्यासमोर ती प्रतिमा तयार झाल्याशिवाय राहत नाही.
अमृताहूनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां बा नेघे ॥
संत नामदेवांचा हा सुप्रसिद्ध अभंग आहे. यात ते पांडुरंग नामाची तुलना अमृताशी करत आहेत आणि हरिनाम त्याहीपेक्षा गोड आहे, हे स्वानुभवातून सांगत आहेत. हे माहीत असूनही लोक ते का घेत नाहीत असा प्रश्न ते काकुळतीने विचारत आहेत.
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥
संत शिरोमणी तुकाराम महाराज समस्त वारकऱ्यांचे मनोगत जणू काही या अभंगातून मांडतात, ज्याच्या दर्शनासाठी आतुर झालो होतो, एवढी पायपीट करून आलो, त्या पांडुरंगाचे नुसते चरण पाहिले, आता आणखी कोणत्याही विषयाकडे मन धावणार नाही असा स्वानुभव ते व्यक्त करतात.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥
संत एकनाथ महाराज म्हणतात, देहरूपाने आमचे अस्तित्त्व दिसत असले तरी आमचा आत्मा विठ्ठल आहे. जो या देहात व्यापून राहिला आहे. देवाला आपलेसे करून घ्यायचे असेल तर एवढी एकरूपता व्हायला हवी, याचा जणू ते आदर्श घालून देत आहेत.
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशोधडी आपणियासी ॥
संत गोरा कुंभार या अभंगात म्हणतात, देवाच्या सन्निध जायचे असेल तर इतर विषयांची आसक्ती कमी व्हायला हवी. जर देवाप्रती तुमचे प्रेम शुद्ध असेल तर तोच तुम्हाला विषयातून मुक्त करतो आणि देशोधडीला लावतो आणि त्याच्याशी संग जोडून घेतो.
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
माउली अर्थात संत ज्ञानेश्वर लिहितात, जेव्हा भगवंताला प्रत्यक्ष पाहतो, त्याचे दर्शन घेतो, डोळेभरून न्याहाळतो, तेव्हा जे सुख मिळते त्या सुखाची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. हे सुख देणारा पांडुरंग, त्याची गोडी आपल्याला लागली हे आपले भाग्यच समजा.
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनियां ॥
असा हा पांडुरंग अठ्ठावीस युगं आपल्या भक्तांच्या भेटीसाठी कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे आणि ते ध्यान अर्थात ते रूप अतिशय सुंदर दिसत आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. हे रूप बघून कधीही कंटाळा येणार नाही तर रोज हे श्रीमुख आवडीने बघण्याची माझी तयारी आहे.
हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥
भगवंताकडे काय मागावे? संसारसुख? नाही! ते तर त्याने न मागताच दिले आहे आणि ते कितीही मिळाले तरी अपुरे पडणारे आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता आम्हाला एवढेच दान दे, की तुझा विसर कधीही पडू नये. तुझ्यासमोर मुक्ती, मोक्ष, धन, संपत्ती कवडीमोल आहे. तुझे नामःस्मरण होणार असेल तर कितीही यातना भोगाव्या लागल्या तरी मनुष्य जन्मात वारंवार येण्याची आमची तयारी आहे!