तंबाखूच्या व्यसनाविषयी झालेल्या सभेनंतर अमोल सरांशी खरंतर अजून बोलायचं होतं. म्हणून मग मी त्यांना विचारून सोयीची वेळ मागून घेतली. आणि ठरल्या दिवशी हजर झालो.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मुक्तांगण आणि लोकमत एकत्रितपणे काम करीत आहेत हे पाहून मुक्तांगणमधील सर्वांना आनंद झाला असावा. सगळे जण माहिती देण्यासाठी उत्सुक होते.
मुद्दाम वेळ काढून मला भेटत होते. ते म्हणाले, ‘‘आम्हा सगळ्यांना वाटतं की, व्यसनांविषयी विशेषत: त्याच्या वाईट परिणामांबद्दल अनेक लोकांना माहिती नसते. आणि विशेषत: तंबाखूचं व्यसन कुणी मनावर घेत नाही. ते दुर्लक्षच झालेलं व्यसन आहे. त्याबद्दल फार गंभीरपणे कुणी विचारही करत नाही. विशेषत: तरु ण मुलामुलींच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखू येते आणि जी चिकटते ती कायमची चिकटूनच राहते. आमच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात असे म्हणतात की, कॅच देम यंग. नॉलेज इज द पॉवर.’
त्यानंतर अनेक मुलं मोकळेपणानं बोलले. आपापल्या व्यसनाबद्दल, व्यसनी होण्याबद्दल सांगत राहिले.
सगळ्यात आधी एकानं आपल्याच एका जवळच्या मित्राचा अनुभव सांगितला. तो घरात झोपला होता. त्यानंतर जे काही घडलं ते त्याच्या पत्नीनं सांगितलं. कारण त्याला नेमकं काय घडलं हेही धड आठवत नव्हतं.
त्याला एकाएकी धाप लागली होती. सगळं अंग घामाघुम झालं होतं. सगळा देह ओंडक्यासारखा कडक झाला होता. त्याला बहुधा फीट आली होती. दातखीळ बसली होती. त्याचवेळी ठसका लागला होता. घाईघाईने त्याला इस्पितळात दाखल करणं गरजेचं होतं. पण त्याला उचलून गाडीत ठेवणं हीच मोठी कसरत होती. ब्लडप्रेशर २५0-१५0 इतकं वाढलं होतं. अर्धांगवायूचा झटका येईल अशी भीती डॉक्टरांना वाटत होती. तोंडातून फेस बाहेर येऊ लागला होता. घशात नळ्या घालून अडकलेला कफ बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. अचानक नळीत गुटक्याचा एक खडा अडकला आणि कफ बाहेर येणं बंद झालं.
दोन तास उलटून गेले तरी तो शुद्धीवर येत नव्हता. म्हणून त्याच्या मेंदूचा स्कॅन करण्याचं ठरलं. बेशुद्धावस्थेतच त्याला स्कॅनसाठी नेण्यात आलं. तिथे तो थंडीने गारठून गेला. मशीनमधून त्याला आत नेणं इतकं कठीण झालं की त्याचे पाय इतरांना दाबून धरावे लागले. रिपोर्ट सकाळी मिळणार होते. परंतु तो रात्रभर शुद्धीत न आल्याने त्याची रवानगी पुण्यातील एका बड्या रुग्णालयात करण्यात आली. ब्लडप्रेशरही काही केल्या खाली येत नव्हतं. इसीजी नॉर्मल नव्हता. त्याच्या नाका-तोंडात नळ्या घातल्या होत्या. डॉक्टर त्याचा जीव वाचवण्यासाठी अक्षरश: शर्थ करीत होते. आय.सी.यू.मध्ये त्याच अवस्थेत दोन दिवस राहिल्यावर त्याला शुद्ध आली. पण माणसांची ओळख पटत नव्हती. हळूहळू तो माणसं ओळखू लागला. मग जरा नॉर्मल झाला. या काळात याच्या बायकोचं, घरच्यांचं जे झालं ते तर शब्दात सांगणं अवघड! अखेर दहा दिवसांनी त्याला इस्पितळातून सोडलं. निघताना डॉक्टर त्याला म्हणाले, ‘तुम्ही नशीबवान आहात. वाचलात! पण पुन्हा असं काही झालं तर नशीब साथ देईल याची काय खात्री?’
त्यानं अधीरपणे डॉक्टरांना विचारलं, पण डॉक्टर हे सारं असं झालंच कशामुळे?
डॉक्टरांनी जे सांगितलं ते त्याला संपूर्णपणे नवीन होतं.
डॉक्टर म्हणाले, ‘अनेक वर्षं तंबाखू खाल्ल्यानं रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या आहेत. पाण्याच्या पाइपला जर बोट लावून ठेवलं तर पाणी जसं अधिक जोरानं बाहेर पडतं तसंच काहीसं रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे होतं. त्यामुळे रक्त जोरानं हृदयाकडे जातं. पण त्याचवेळी मेंदूला अपेक्षित रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे शुद्ध जाते. एकच सांगतो, यापुढे तंबाखू खाणं चालू ठेवलं तर कोणतंही औषध तुम्हाला वाचवू शकणार नाही. आणि त्यातून समजा वाचलात तर अर्धांगवायूच्या झटक्यानं कायमचं अंथरु णावर पडून राहावं लागेल.’
घरी आल्यावर फक्त काही दिवस त्यानं तंबाखू खाणं बंद केलं. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या
म्हणत तंबाखू त्याच्या जीवनात परत आली. तंबाखू मळत तोच लोकांना सांगू लागला, झालं ते झालं. अँक्सिडेण्ट होता. असं काय नेहमी नेहमी होत नाही.
खरंच पुढं दोन वर्षे त्याला काही झालं नाही. तो तंबाखूची गोळी लावतच होता.
पण दोन वर्षांनंतर पुन्हा पूर्वी झालं तसंच झालं. पण यावेळची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. त्याच्या मेंदूतील रक्तवाहिन्यांत छोटे छोटे डाग दिसत होते. केवळ परमेश्वराच्या कृपेने तो वाचला.
या घटनेनं त्याला तंबाखू बंद करायला एकदाचं प्रेरित केलं. आणि खरोखर गेली दोन वर्षं त्यानं तंबाखू पूर्ण सोडली. त्याच्या चेहर्यावर वेगळं तेज दिसू लागलं. घरातले सगळे खूश होते. इतके की त्याच्या आईनं त्याला एक महागडा फोन भेट दिला.
पण?
काही दिवसानं त्यानं पुन्हा तंबाखू खाणं पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात सुरू केलं. अगदी झोपतानासुद्धा तो तोंडात बार ठेवून झोपत असे.
आता त्याच्या बायकोने तंबाखू या विषयाला कटाप केलं आहे. ती म्हणते, ‘तो आणि त्याचं नशीब. पुन्हा काही झालं तर सरळ सरकारी दवाखान्यात भरती करीन. त्याच्यावर उपचार करणं, त्याची सेवा करणं, रात्रभर जागरणं करणं आता मला परवडणार नाही. माझंच चुकलं. लग्नाच्या आधीपासून तो मावा खातो हे मला माहिती होतं. इतकंच कशाला, बोहल्यावर उभी असताना, त्याच्या गळ्यात माळ घातली तेव्हाही एकदम तो भपकारा आला. मला वाटलं माझ्यासाठी तो या व्यसनातून बाहेर पडेल. पण नाही. कितीही कटकट केली तरी त्यानं कधी ऐकलं नाही. आता काय मरेल तो असाच!’
***
ही सारी हकिकत ऐकून मी हादरून गेलो. मृत्यूच्या दारात जाऊन दोनदा परत आलेल्या माणसाला परत तंबाखू खात राहावंसं का वाटत असेल?
असं म्हणतात की, माणसाला सर्वात जास्त भय असतं ते मृत्यूचं!
पण तंबाखूची नशा मरणाचं भयही संपवून टाकतं की काय?
अशा मरणाच्या खाईत का ढकलतात तरुण मुलं स्वत:ला?
काय असतं तरी काय या तंबाखूत?
- आनंद पटवर्धन
सहकार्य : मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे
सोडू म्हणता सुटत नाही!
१) मी अनेकदा तंबाखू सोडली, असं अनेकजण सांगतात. पण म्हणून त्यांची तंबाखू सुटत नाही.
२) तंबाखूचं व्यसन हे फक्त ग्रामीण भागातील तरुणांना असतं, हा एक गैरसमज.
३) तंबाखूचे बळी सर्रास दिसतात; पण त्या व्यसनातून सुटण्यासाठी आवश्यक गांभीर्यानं प्रयत्नच केले जात नाहीत.