सिनेमाच्या पडद्यावर कसा बदलला शुद्ध देसी रोमान्स?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:58 PM2019-02-14T12:58:17+5:302019-02-14T12:59:06+5:30

‘शादी के पहले हमसे ये भूल ना हो जाए’ म्हणणारी नायिका आणि मैने उसे आजतक छुआतक नहीं म्हणणारे नायक एकदम कसे बदलले?

Romance & hindi fims - a journey of change on screen! | सिनेमाच्या पडद्यावर कसा बदलला शुद्ध देसी रोमान्स?

सिनेमाच्या पडद्यावर कसा बदलला शुद्ध देसी रोमान्स?

Next
ठळक मुद्दे ही आजची पिढी आहे,, प्रेमाचा शारीर भाग हा कोणत्याही भुकेसारखा सहजतेने स्वीकारणारी..

-मुकेश माचकर

एक लडकी/लडके को देखा तो ऐसा लगा..
होùùùù एक लडकी को देखा तो ऐसा लगा.. - पडद्यावर नायक सॉफ्ट फोकसमध्ये स्वप्नवत वाटणार्‍या घरातल्या स्वप्नवत वाटणार्‍या पलंगावर मऊ मऊ उशी फाडून मुलायम सावरीची पिसं उधळत असतो. त्याला भूल घालणारी रूपवती नायिका दवबिंदूसारख्या टवटवीत चेहर्‍यानं इकडे तिकडे बागडताना दिसते.
..25 वर्षापूर्वी भव्य पडद्यावर ही दृश्यं पाहणं तेव्हाच्या पिढीसाठी अत्युच्च रोमँटिक होतं!
आता 25 वर्षानंतर हे गाणं टीव्हीवर लागतं आणि आता मम्मी-पप्पा झालेले तेव्हाचे तरुण भान हरपून वगैरे ते गाणं पाहात असतात, आपापल्या मनातल्या तेव्हाच्या हळव्या, हुळहुळ्या आठवणींमध्ये रमून गेलेले असतात तेव्हा त्यांची आता टीनएजच्या आगेमागे असलेली मुलं म्हणतात, यार लडकी को देखा, अच्छा लगा तो ठीक है, लेकिन उसपे इतना इधर उधर घूम के सेंटी मारने की क्या जरुरत है?.. आवडली तर भिड ना भावा ! 
..बरं आता कलम 377 रद्द झाल्यानंतरच्या काळात तर ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चाच अर्थ बदलून गेलाय.
25 वर्षापूर्वी त्या आयकॉनिक गाण्यातला प्रेमार्त अनिल कपूर आता त्याच गाण्याच्या ओळीचं नाव धारण करून आलेल्या सिनेमात नायिकेचा बाबा आहे. (नायिका सोनम, त्याचीच मुलगी आहे.)  आईवडील तिच्यासाठी मुलगा शोधत असताना ती मात्न एका मुलीमध्ये जीव गुंतवून बसली आहे..
..हा सिनेमा आजच्या युगात कौटुंबिकपट म्हणून प्रदर्शित झाला आहे आणि त्यानं संस्कृती बुडवायला घेतली म्हणून एकही संस्कृतिरक्षक दगड कोणत्याही मल्टिप्लेक्सच्या काचेवर भिरकावला गेलेला नाही..
.. ‘1942 अ लव्ह स्टोरी’नंतर दोनच वर्षानी ‘फायर’ आला होता. त्यात पहिल्यांदा लेस्बियन प्रेमाची कथा सांगितली गेली होती. त्यातल्या नायिकांची नावं ही देवतासमान स्रियांची नावं असल्यामुळे गदारोळ उडाला होता. 
त्यानंतर नव्या सहस्रकाच्या सुरु वातीला ‘कल हो ना हो’मधल्या शाहरूख-सैफच्या मैत्नीच्या निमित्ताने गे जोक्स सिनेमात आणले. ‘दोस्ताना’मध्ये या गंभीर नात्याचा ‘इनोदी’ वापर करून झाला. मग या सिनेमांच्या कत्र्याचं कमिंग आउट झालं, तसं सिनेमाचंही कमिंग आउट झालं.. तिथपासून ते ‘एक लडकी को..’र्पयतची उडी कौतुकास्पद आहे..
..हा (खरा) ‘नवा भारत’ आहे !
..‘शुद्ध देसी रोमान्स’च्या सगळ्या धुवट कल्पना धुवून काढून भरचौकात वाळत घालणार्‍या नव्या पिढीचा नवा भारत. विचार करा, एकेकाळी व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी हट्टानं मातृपितृदिन मनवला जात होता, प्रेमी युगुलं शोधून त्यांच्यावर सांस्कृतिक पोलिसगिरी केली जायची. ते करणार्‍या एखाद्या लाठीधारी स्वघोषित संस्कृतिरक्षकानं आता ‘शुद्ध देसी रोमान्स’ या शीर्षकावरून गैरसमज करून घेऊन सहकुटुंब तो सिनेमा पाहण्याचा बेत आखला असता, तर काय झालं असतं? बिचारा, वय उलटून गेल्यावर दीड तासातच वयात आला असता आणि मग निश्चिंत मनानं सहकुटुंब ‘बेफिक्रे’ पाहण्याचंही धारिष्टय़ त्याच्या अंगात आलं असतं..
..गेल्या 25 वर्षात आपण कुठून कुठे आलो आहोत, याचा बॅरोमीटर म्हणून सिनेमाकडे पाहायला हवं. एकेकाळी फिरोज खानच्या ‘प्रेमअगन’नामक सिनेमातली नायिका अतीव घट्ट कपडय़ांमध्ये अंगप्रदर्शन करत नायकाबरोबर गाणंभर कामासनं केल्यानंतर एकदम ‘शादी के पहले हमसे ये भूल ना हो जाए’ वगैरे संस्कारी लेक्चर देत होती.
काळ थोडा पुढं सरकला तेव्हा नव्वदच्या दशकात हिंदी सिनेमा हलकीफुलकी बंडखोरी करायला लागला होता; पण यशराज फिल्म्सच्या गोड गिळगिळीत प्रणयपटांचा प्रभाव जास्त होता. प्रेमाची शारीर बाजू नकळत यायला हवी त्यासाठी नायिका पांढरे कपडे घालून भिजायला हवी असं तरी दाखवत किंवा मोहोब्बतें, कभी खुशी कभी गमसारख्या सिनेमांमध्ये मॉड गर्ल बनून कमी कपडय़ांमध्ये नायिका वावरत होती. प्रेमाची शारीर बाजू म्हणजे फक्त उसासे, विशिष्ट भागांची धकधक इतकंच काय ते तिला माहिती ! शिवाय, त्यात हातून काही ‘अनिष्ट’ घडलं, पाय घसरलाच, तर पश्चात्तापाचे उमाळेच. 

शुद्ध शारीर प्रेम, हवस वगैरे गोष्टी एकेकाळी भट कॅम्पकडे राखीव होत्या. मल्लिका शेरावत, बिपाशा बसू, इमरान हाश्मी, जॉन अब्राहम (सुरुवातीच्या काळातला) यांच्या या कामुकपटांना जोरदार प्रतिसाद मिळाला; पण तो चोरटा. एकच शो वडील आणि मुलगा बघायचे, पण एकमेकांच्या नकळत, वेगवेगळ्या रांगांमधून. मुलाला वाटायचं वडील ऑफिसात आहेत, वडिलांना वाटायचं मुलगा कॉलेजात आहे..

मग आला अनुष्का-रणवीरचा ‘बँड बाजा बारात’. तो आई-वडील-मुलगा-मुलगी यांनी एकत्र बसून पाहिला असेल आणि आपल्या नकळत आपण किती पुढे आलो, हे त्यांनाही कळलं नसेल. नायकाच्या प्रेमात पडल्यानंतर पुढाकार घेऊन त्याच्याशी शरीरसंबंध ठेवणारी आणि त्याबाबतीत अगदी स्वच्छ, स्पष्ट, निर्मळ असणारी नायिका या सिनेमाने दाखवली. नायक अचानकपणे कचरू लागला आहे, हे कळल्यावर ‘मेरी इज्जत लूट गयी’ वगैरे रोनाधोना न करता सरळ व्यवसायावर लक्ष केंद्रित करणारी आणि त्यातून त्याला त्याची जागा दाखवून देणारी नायिका ही फारच पुढची पायरी होती. उठता बसता कॅज्युअल सेक्सच्या गप्पा आणि प्रयोग दाखवणारे उच्चभ्रू सेटिंगमधले ‘वीरे दी वेडिंग’सारखे सिनेमे आणि हा सिनेमा किंवा इशकजादेसारखा सिनेमा, यांच्यात फरक होता.
क्वीन हा काही रूढार्थाने प्रेमपट नव्हे; पण तो सर्व धाडसी प्रेमपटांच्या पुढे जाणारा सिनेमा आहे. इथे नायिका लग्नाची चौकट मोडून आधी स्वतर्‍वर प्रेम करायला शिकलेली दिसते..
ज्याला किंवा जिला स्वतर्‍वर प्रेम करता येत नाही, तो किंवा ती दुसर्‍यावर काय प्रेम करणार? असं वाटणारी ही आजची पिढी आहे, स्वतर्‍वर प्रेम करणारी, आपले गोल्स सेट असणारी, नको तिथे इमोशनल गुंते करून न ठेवणारी, प्रेमाचा शारीर भाग हा कोणत्याही भुकेसारखा सहजतेने स्वीकारणारी.. त्यात काही थोर बोल्ड वगैरे आहे, असाही अविर्भाव नसणारी..
.. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे या पिढीचंही गाणं असू शकतं. पण, गाणारा ‘तो’च असला पाहिजे किंवा ‘एक लडके को देखा तो ऐसा लगा’, अशी भावना कोणा युवकाच्या मनात उमटताच कामा नये असं कुणाला वाटतही असेल; पण ते वाटणं आता तरुण पिढीपुरतं आणि त्यांची भाषा बोलणार्‍या सिनेमांपुरतं तरी संपत आलेलं आहे.
सिनेमातलं इश्क, लव्ह आणि इश्कवाला लव्ह बदललंय ते असं..


(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि सिनेसमीक्षक आहेत.)
 

Web Title: Romance & hindi fims - a journey of change on screen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.