भावा, आम्ही हाय तर फिकर नॉट; जिवाला जीव देणाऱ्या गावातली 'कोल्लापुरी आर्मी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 07:00 AM2019-08-15T07:00:00+5:302019-08-16T17:04:57+5:30

बेधडक, रांगडं आणि जिवाला जीव देणारं गाव अशी कोल्हापूरची ओळख आहेच. त्या कोल्हापूरवरच अस्मानी संकट ओढवलं म्हणताना पोरं गपगार घरात बसणार नव्हतीच. ती धावली मदतीला.

Kolhapur Flood- meet Kolhapur youth working for flood aid.. | भावा, आम्ही हाय तर फिकर नॉट; जिवाला जीव देणाऱ्या गावातली 'कोल्लापुरी आर्मी'

भावा, आम्ही हाय तर फिकर नॉट; जिवाला जीव देणाऱ्या गावातली 'कोल्लापुरी आर्मी'

Next
ठळक मुद्देसगळीकडे तरुण पोरंच आघाडीवर, काम कुणी सांगायची गरजच नाही, जिथं गरज तिथं ही पोरं पोहचायला लागली..

 - संतोष मिठारी

..भावा काळजी करायची नाय!’, 
आम्ही हायं, तर फिकर नॉट.’
- अशा खास कोल्हापुरी स्टायलीत पुरात अडल्या माणसांना हात देत रांगडे कोल्हापूरचे तरणे पोरं असे पुढं सरसावले की त्याचं नाव जे म्हणता ते! 
बेधडक, रांगडं आणि जिवाला जीव देणारं गाव अशी कोल्हापूरची ओळख आहेच. त्या कोल्हापूरवरच अस्मानी संकट ओढावलंय तर पोरं गपगार घरात बसणार नव्हतीच. ती धावली मदतीला. सगळीकडे तरुण पोरंच आघाडीवर, काम कुणी सांगायची गरजच नाही, जिथं गरज तिथं ही पोरं पोहचायला लागली. कोसळणारा धो धो पाऊस आणि पुराने वेढा घातलेला होता, त्याला न भीता, न डरता तरुण मुलंमुली मोठय़ा प्रमाणात  बचाव आणि मदतकार्यात भाग घ्यायला पुढं आले. आजही ते काम चालूच आहे. सरकारची मदत येईल नि आर्मी येईल याची वाटच या तरुणांनी पाहिली नाही. त्यांनी स्वतर्‍च काम सुरू केलं आणि जिथं जिथं माणसं अडकली होती, त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली. 
कोल्हापुरात मंडळं भरपूर, त्यात तरुण मुलांचा भरणा या तरुणांनी मग मदत, बचावकार्यासाठीची सरकारी यंत्रणेला समांतर आणि आणि मदत करणारी अशी यंत्रणाच उभी केली. 
 कोल्हापुरात पाणी वाढतच होतं, पुराचा विळखा, बाहेर जगाशी संपर्कच तुटला. बहुतांश मार्ग बंद झाले, वीजपुरवठा खंडित झाला. संपर्काची साधनं अपुरी पडू लागली. मोबाइलने माना टाकल्या आणि कुणाला वाट दिसू नये असं पाणी उसळू लागलं. त्या कसोटीच्या क्षणी या पोरांनी माणसांना तर हात दिलाच; पण पाण्यातून बाहेर काढत त्यांना सुरक्षितस्थळी हलवलं. विविध छावण्यांमधील पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून घ्यायला मदत केली. त्यांना जेवण, कपडे, आवश्यक साहित्याचा पुरवठा कुठून कुठून जमवून सुरू केला.
 ज्यांना पुरातून बाहेर काढणे शक्य नाही, अशा लोकांर्पयत खाद्यपदार्थ, पाणी पोहोचविण्याचं काम तर तरुण पोरांनी रात्रंदिवस केलं.
शहरातल्या सामाजिक संस्थाही मदतीला आल्या. युवावर्गाने चित्रदुर्गमठ, मुस्लीम बोर्डिग यासह अनेक ठिकाणी स्थलांतरित पूरग्रस्तांच्या कॅम्पची जबाबदारी सांभाळली. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली आणि आंबेवाडी, तर शिरोळ तालुक्यातील काही गावं यांची पूरपरिस्थिती भीषण होती, तिथं तरुण पोरांनीच सुरुवातीला बचाव कार्य हातात घेतलं. हातात होती नव्हती ती साधनं वापरली आणि लोकांच्या मदतीला धावले. माणसांइतकाच प्यारा जीव होता जनावरांचा. आपल्या घरातले मुके सदस्य पाण्यातच ठेवून घराबाहेर पडायला माणसंही तयार नव्हती. त्यामुळं जनावरांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं मोठं काम या तरुण मुलांसमोर होतं. त्यांनी भरपुरात जनावरंही सुरक्षित हलवली. ‘एनडीआरएफ’, आपत्ती व्यवस्थापन, व्हाइट आर्मी यांच्या बरोबरीनं ही तरुण मुलं उभी राहिली. 
कोल्हापूर वी केअर, ‘एनजीओ कम्पशियन 24’, शिवाजी विद्यापीठाचे एनएसएसचे स्वयंसेवक, विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती, न्यू कॉलेजमधील विवेक वाहिनी, रॉबीनहूड आर्मी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एनएसयूआय, मनविसे, युवासेना, मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसीसह कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील आजी-माजी विद्यार्थी, विविध लहान-मोठय़ा कंपनीमधील नोकरदार युवक-युवतींच्या ग्रुप अशी मोठी यादी करता येईल यासार्‍यांशी संबंधित आणि संपर्कात असलेले केवळ व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर मदतीसाठी बाहेर पडलेले अनेकजण मदतीला धावले.  रात्रंदिवस असं काही काम केलं की लोक अवाक झाले. हे एवढं शहाणपण या पोरांमध्ये आलं कुठून, एरव्ही तर मोबाइलमधून मान वर काढून प्रश्नाला उत्तर द्यायची न्हाइत ही पोरं, आणि आता जीव धोक्यात घालून कामाला भिडलेत. 
पण आहे हे असं आहे, ते म्हणतात ना, हे फक्त कोल्हापुरातच घडतंय! तसंच घडलं. इथली कट्टय़ावरची पोरं, सोशल मीडियामागे पागल झालेली मुलं म्हणून एरव्ही ज्यांना नावं ठेवली जातात, तीच पोरं आज लोकांच्या जिवासाठी जीव द्यायला तयार झालेली दिसली.
म्हटलं ना, हे फक्त कोल्लापुरातच घडतंय!

*************
एकीची जादू. 


ग्रामीण भागात गट-तट आणि तरुण मंडळांमध्ये मोठी ईष्र्या असते. मात्र, महापुराच्या काळात हे गट-तट, ईष्र्या विसरून, जाती-पातीच्या भिंती मोडून तरुणाईने एकजुटीने मदतकार्य राबविले. सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या आरे (ता. करवीर) येथील 50हून अधिक युवकांनी महापुराच्या काळात गावातील निम्म्यांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केलं. जनावरांना हलवलं. दिंडनेर्ली, हणबरवाडी, नंदगाव आदी गावांतील तरुणांनी पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी ओला चारा पुरवण्याचं काम केलं. पूरग्रस्तांना दूधवाटप केले. गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, उचगाव, सरनोबतवाडी, शिरोली या गावांमधील युवकांनी पुणे-बंगलोर राष्ट्रीय मार्गावर शिरोली ते उजळाईवाडीदरम्यान रस्त्यावर अडकून पडलेल्या  वाहनचालकांना चहा, नास्ता आणि जेवण उपलब्ध करून दिलं.

आपल्या माणसांची देखभाल

पुरात घर गेलं, ती माणसं वस्तीला आली की कुठं शाळांत उतरली तर त्यांची अगदी घरातल्या माणसांसारखी देखभाल तरुण मुलंमुली करत होते.  टूथपेस्ट-ब्रशपासून ते रात्री झोपण्यासाठी उबदार ब्लँकेट, डासांपासून सुरक्षिततेची कॉइल इथर्पयत या मुलांनी पुरवलं.  माणसांवर माया करणारं हे तारुण्य लोकांची दुवा घेत होतं.

 

सोशल मीडियाची मदत


‘नेट’करी तरुणाईने सोशल मीडियाद्वारे मदत उभी करण्याचं काम केलं. माहिती सर्वदूर पोहचवली. कोणत्या ठिकाणी, कोणत्या स्वरूपातील मदतीची गरज आहे ते अनेकांर्पयत पोहोचविण्याचं काम केलं. महापुराची स्थिती, पाणी पातळी कमी-अधिक होणं, आदी विविध स्वरूपातील माहिती क्षणाक्षणाला तरुणाईकडून सोशल मीडियावर दिली जात होती. नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, पुणेसह राज्य आणि देशभर असलेल्या कोल्हापूरच्या तरुणांनीही तिथं आपल्या गावकर्‍यांसाठी मदत उभी करण्यासाठी सोशल मीडियाची मोठी मदत घेतली.  

(संतोष लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत बातमीदार आहे.)  


 

Web Title: Kolhapur Flood- meet Kolhapur youth working for flood aid..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.