राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्राचा कुमार संघ उपांत्य फेरीत गारद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 11:36 IST2019-02-19T11:36:24+5:302019-02-19T11:36:36+5:30

४५ व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी" स्पर्धेत मुलांमध्ये चंदीगड, तर मुलींत साई संघांनी अंतिम विजेतेपद मिळविले.

National Kabaddi: Maharashtra boys team crashed in semi-finals | राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्राचा कुमार संघ उपांत्य फेरीत गारद 

राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्राचा कुमार संघ उपांत्य फेरीत गारद 

कोलकाता :  येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात झालेल्या ४५ व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी" स्पर्धेत मुलांमध्ये चंदीगड, तर मुलींत साई संघांनी अंतिम विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या मुलांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

मुलांच्या अंतिम सामन्यात चंदीगडने उत्तर प्रदेशचे आव्हान ४१-३२असे संपवित या गटाचे जेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात अत्यंत चुरशीनें खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात साईनें हरियाणावर ३३-२९अशी मात करीत या गटाचे विजेतेपद आपल्याकडे राखले. या अगोदर झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात चंदीगडने महाराष्ट्राला ४८-३४ असे,तर उत्तर प्रदेशने तामिळनाडूला २७-१९असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. मुलींमध्ये साईने उत्तर प्रदेशवर ३९-२१ असा, तर हरियाणाने छत्तीसगडवर ३३-१९ असा विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली होती.

तत्पूर्वी, महाराष्ट्राच्या मुलींनी ड गटातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ओडीसाचा ४०-१९असा पराभव करीत या गटात अपराजित रहात बाद फेरी गाठली होती. पूर्वार्धात १लोण देत महाराष्ट्राने २३-०९अशी भक्कम आघाडी राखली होती. या मोठ्या आघाडी मुळे प्रशिक्षिका वीणा खवळे (शेलटकर) हिने आपल्या राखीव खेळाडूंनाही खेळण्याची संधी दिली. उत्तरार्धात आणखी १लोण देत हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. सोनाली हेळवी, प्रतीक्षा तांडेल यांच्या दमदार चढाया त्याला साक्षी रहाटेच्या पकडीची मिळालेली मजबूत साथ यामुळे हा विजय सोपा गेला.

महाराष्ट्राच्या मुलांनी देखील क गटात हिमाचल प्रदेशचा ३५-३१ असा पराभव करीत या गटात अव्वल क्रमांक पटकावित बाद फेरी गाठली. पूर्वार्धात एक लोण देत २२-०९अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरार्धात हिमाचलने चांगलेच झुंजवले. लोणची परतफेड करीत हिमाचलने महाराष्ट्राची आघाडी कमी करीत आणली. पण मोक्याच्या क्षणी महाराष्ट्राचे प्रशिक्षक आयुब पठाण व लक्ष्मण गावंड यांनी खेळाडूंना सामना शांतपणे खेळण्यास प्रवृत्त करीत सामना आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पंकज मोहिते, असलम इनामदार यांचा अष्टपैलू खेळ त्याला शुभम शेळके, सौरभ पाटील यांची मिळालेली चढाईची साथ यामुळे हा विजय मिळविता आला. महाराष्ट्राचा बचाव उत्तरार्धात दुबळा ठरला.

 

Web Title: National Kabaddi: Maharashtra boys team crashed in semi-finals

टॅग्स :Kabaddiकबड्डी