इंग्लंडचा भारतावर ९ गडी राखून विजय

By Admin | Updated: January 20, 2015 14:34 IST2015-01-20T09:34:05+5:302015-01-20T14:34:48+5:30

इयान बेल(८८) व टेलरच्या(५६) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतावर ९ गडी राखून विजय मिळवला.

England beat India by 9 wickets | इंग्लंडचा भारतावर ९ गडी राखून विजय

इंग्लंडचा भारतावर ९ गडी राखून विजय

ऑनलाइन लोकमत

ब्रिस्बेन, दि. २० - इयान बेल(८८) व टेलरच्या(५६) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतावर ९ गडी राखून विजय मिळवला. भारताने इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी अवघे १५४ धावांचे आव्हान ठेवले होते जे त्यांनी २७.३ षटकांत सहज पार केले. बिन्नीच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा अली ८ धावांवर बाद झाल्याने इंग्लंडला धक्का बसला, मात्र त्यानंतर बेल व टेलरने चांगली खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. 
तत्पूर्वी भारताचा डाव अवघ्या १५३ धावांत संपुष्टात आला. भरवशाचे फलंदाज १०० धावांच्या आतच बाद झाल्यानंतर स्टुअर्ट बिन्नीने (४४) कर्णधार धोनीच्या (३४) सहाय्याने भारताचा डाव सावरायचा असफल प्रयत्न केला. इंग्लंडतर्फे फिनने ५ तर अँडरसनने ४ गडी बाद करत भारतीय संघाला खिंडार पाडले. अलीने १ गडी बाद केला.
शिखर धवन अवघा १ धाव करून बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला आणि ती मालिका पुढे तशीच सुरू राहिली. अजिंक्य रहाणे (३३), अंबती रायुडू (२३), विराट कोहली (४), सुरेश रैना (१), अक्षर पटेल (०), भुवनेश्वर कुमार (५) आणि मोहम्मद शमी (१) एकामागोमाग एक बाद होत गेल्याने भारतीय संघाचा डाव अवघ्या दीडशे धावांत आटोपला. 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर या सामन्यात चांगला खेळ करून विजयाचे खाते उघडण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरला होता खरा मात्र फलंदाजांच्या हाराकिरीमुळे या सामन्यातही भारताची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

Web Title: England beat India by 9 wickets