भेसळयुक्त फळे-भाज्यांविरोधात राज्य सरकार सतर्क; बाजार समित्या व व्यापाऱ्यांना कडक सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:00 IST2026-05-09T11:59:40+5:302026-05-09T12:00:05+5:30
विशेषतः फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी तसेच भाज्यांना आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रीत केले आहे.

भेसळयुक्त फळे-भाज्यांविरोधात राज्य सरकार सतर्क; बाजार समित्या व व्यापाऱ्यांना कडक सूचना
नवी मुंबई : बिर्याणीसोबत कलिंगड खाल्ल्याच्या प्रकरणानंतर आता फळे, भाज्या आणि अन्य शेतमाल कृत्रिम रसायनांचा वापर करून पिकवणे, रंगवणे किंवा दीर्घकाळ टिकवण्यासाठी घातक प्रक्रिया करण्याच्या प्रकारांवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात पणन संचालक शरद दरे यांनी शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार आणि थेट पणन परवाना धारकांना सूचना जारी केल्या आहेत.
नियमित तपासणीचे आदेश
राज्यातील बाजार क्षेत्रांमध्ये शेतमाल खरेदी-विक्रीदरम्यान भेसळ, वजनातील फसवणूक आणि कृत्रिम रसायनांचा वापर रोखण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेषतः फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी तसेच भाज्यांना आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रीत केले आहे.
पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यास प्रोत्साहन
परिपत्रकानुसार, बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांची वेळोवेळी तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी. फळे-भाज्या साठवणूक, वाहतूक आणि विक्रीदरम्यान प्लास्टिक व थर्माकोलचा कमीत कमी वापर करून पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्याही सूचना केल्या आहेत.
भेसळ करणाऱ्यांचे परवाने होणार रद्द
अन्नपदार्थ किंवा शेतमालामध्ये भेसळ अथवा घातक रसायनांचा वापर झाल्याचा संशय आल्यास संबंधित नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठवले जाणार आहेत.
दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कारवाई करण्याचे
निर्देश दिले आहेत. तसेच भेसळ करणाऱ्या परवाना धारकांचे परवाने रद्द करणे, त्यांना दिलेल्या सुविधा काढून घेणे यांसारखी कठोर कारवाई करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय गंभीर असल्याने बाजार समित्या आणि प्रशासनाने समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शेतमाल करून द्यावा, असे आवाहन केले.