पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे, तृणमूलचे जंगलराज लवकरच संपणार..; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 18:31 IST2026-01-18T18:31:18+5:302026-01-18T18:31:59+5:30
'ज्या राज्यांमध्ये भाजपची डबल इंजिन सरकारे आहे, तिथे विकासाची गती स्पष्टपणे दिसते.'

पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे, तृणमूलचे जंगलराज लवकरच संपणार..; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र
सिंगूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे झालेल्या जाहीर सभेतून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. 'पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट उसळली आहे. राज्याला आता खऱ्या बदलाची गरज आहे. बंगालची जनता टीएमसीच्या महाजंगलराजला कंटाळली असून, आता राज्यात नक्कीच परिवर्तन होणार,' असा दावा मोदींनी केला.
डबल इंजिन सरकारशिवाय विकास शक्य नाही
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'ज्या राज्यांमध्ये भाजपची डबल इंजिन सरकारे आहे, तिथे विकासाची गती स्पष्टपणे दिसते. पश्चिम बंगालमध्ये मात्र टीएमसी सरकार केंद्राच्या गरीब कल्याण योजनांना अडथळा आणते. आयुष्मान भारतसारख्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू देत नाही.' दिल्लीचे उदाहरण देत मोदी म्हणाले, 'जशी दिल्लीतील जनतेने विकास रोखणाऱ्या सरकारला सत्तेबाहेर काढले, तशीच बंगालची जनतादेखील टीएमसीच्या निर्दयी सरकारला धडा शिकवणार आहे.'
बंगाल बिहारसारखा जंगलराज बदलण्यास सज्ज
'आजचा जनतेचा उत्साह बंगालची नवी कथा सांगतो आहे. जसे बिहारमध्ये 15 वर्षांचा जंगलराज संपवण्यात आला, तसेच आता बंगालमध्येही टीएमसीचा महाजंगलराज संपवण्याची तयारी झाली आहे.' मोदी यांनी बंगालच्या भौगोलिक आणि आर्थिक क्षमतेवर भर देत म्हटले की, 'बंगालकडे सुपीक जमीन, मोठ्या नद्या, विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि प्रत्येक जिल्ह्यात काहीतरी खास आहे. भाजप सरकार प्रत्येक जिल्ह्याची ताकद वाढवेल. सत्तेत आल्यानंतर बंगालमध्ये उद्योग पुन्हा भरारी घेतील,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घुसखोरीला टीएमसीचे संरक्षण
पंतप्रधान मोदींनी टीएमसीवर राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ केल्याचा आरोप केला. 'घुसखोरांना सरकारकडून सुविधा दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, सिंडिकेट टॅक्स आणि माफियागिरीमुळे उद्योग अडले आहेत. सीमारेषेवर कुंपणासाठी केंद्राच्या मागणीला राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. घुसखोर हे टीएमसीचे पक्के मतदार असल्याने त्यांचे संरक्षण केले जाते. आता वेळ आली आहे की, बेकायदेशीर घुसखोरांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जावे,' असे मोदी म्हणाले.