सायकल शिकताना तोल गेला अन् काळजाचा तुकडा थेट नाल्यात कोसळला; उघड्या सळईने घेतला चिमुरड्याचा बळी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:55 IST2026-02-20T15:54:46+5:302026-02-20T15:55:31+5:30
ज्या सायकलसाठी कन्हैयाने आपल्या वडिलांकडे हट्ट धरला होता, तीच सायकल चालवताना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

सायकल शिकताना तोल गेला अन् काळजाचा तुकडा थेट नाल्यात कोसळला; उघड्या सळईने घेतला चिमुरड्याचा बळी!
नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचा प्रत्यय गोरखपूरच्या चिलुआताल भागात आला आहे. ज्या सायकलसाठी कन्हैयाने आपल्या वडिलांकडे हट्ट धरला होता, तीच सायकल चालवताना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. काम सुरू असलेल्या नाल्यातील उघड्या सळईने कन्हैयाचा जीव घेतला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाच दिवसांपूर्वीच मिळाली होती सायकल
मुडीला येथील रहिवासी श्याम सुंदर चौरसिया यांचा १२ वर्षांचा मुलगा कन्हैया याला सायकल चालवण्याची प्रचंड ओढ होती. तो इतर मुलांकडे सायकल मागायचा, पण अनेकदा त्याला नकार मिळायचा. हे पाहून भाजी विक्रेते असलेल्या त्याच्या वडिलांनी १४ फेब्रुवारी रोजी आपल्या हलाखीच्या परिस्थितीतून २,६०० रुपये जमवून त्याला नवीन सायकल भेट दिली होती. सायकल मिळाल्यामुळे कन्हैया खूप आनंदी होता आणि गेल्या पाच दिवसांपासून तो सायकल शिकत होता.
असा घडला भीषण अपघात
नेहमीप्रमाणे कन्हैया मित्रांसोबत सायकल चालवत घरी परतत होता. यावेळी अचानक त्याचा सायकलवरील ताबा सुटला आणि तो जवळच असलेल्या एका निर्माणाधीन नाल्यात कोसळला. दुर्दैवाने या नाल्यातील काम अर्धवट असल्याने तिथल्या लोखंडी सळया उघड्या होत्या. नाल्यात पडताच एक धारदार सळई कन्हैयाच्या पोटात आरपार घुसली. तो वेदनेने ओरडू लागला, तेव्हा परिसरातील लोकांनी त्याला बाहेर काढले.
मदत करताना झालेली 'ती' चूक पडली महागात?
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कन्हैयाला पाहून लोकांनी त्याला सळईतून मुक्त केले आणि जमिनीवर झोपवले. मात्र, तज्ज्ञांच्या मते, जर त्याला सळई न काढता, त्या सळईसह रुग्णालयात नेले असते, तर रक्तस्त्राव रोखता आला असता. सळई काढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्त वाहून गेले. वडिलांनी तातडीने त्याला बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये नेले, पण ३० मिनिटांच्या उपचारांनंतर त्याची प्राणज्योत मालवली.
हा अपघात पीडब्ल्यूडी आणि जीडीएच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. निर्माणाधीन नाला उघडा ठेवणे आणि त्यात सळ्या तशाच सोडून देणे कन्हैयासाठी मृत्यूचा सापळा ठरले. तीन भावांमध्ये सर्वात मोठा असलेला कन्हैया आता कायमचा सोडून गेल्याने चौरसिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.