नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि देशातील जनतेला कोरोनावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती देशातील किती नागरिकांना आणि कधी दिली जाईल असी विचारणा केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने आज कोरोनाची लस आणि लसीकरणाबाबत मोठं विधान केलं आहे.
कोरोनावरील लस ही देशातील प्रत्येक नागरिकाला द्यावी लागणार नाही, असे आयसीएमआरने म्हटले आहे. याबाबत माहिती देताना आयसीएमआरने सांगितले की, कोरोनावरील लसीकरण हे लस कितपत प्रभावी आहे त्यावर अवलंबून असेल. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे हे आमच्ये लक्ष्य आहे. जर आम्ही धोका असलेल्या अधिकाधिक लोकांचे लसीकरण करून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर कदाचित आम्हाला देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार नाही.
याबाबत आरोग्य सचिवांनी सांगितले की, केंद्र सरकारने संपूर्ण देशात लसीकरण करण्याचा दावा कधीही केलेला नाही. अशा शास्त्रीय गोष्टींबाबत तथ्थ्यांच्या आधारावर बोलले गेले पाहिजे, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. कोरोना लसीची वैद्यकीय चाचणी ही बहुकेंद्रित आणि अनेक ठिकाणी होते. प्रत्येक ठिकाणी एक इंस्टिट्युशन इथिक्स कमिटी असते. ती सरकार आणि उत्पादकांपासून स्वायत्त असते. लसीच्या कुठल्याही वाईट परिणामानंतर ही समिती दखल घेते आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला याचा अहवाल पाठवते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, गेल्या २४ तासांत भारतामध्ये कोरोनाचे ३१ हजार ११८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९४ लाख ६२ हजार ८०९ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४८२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढून १ लाख ३७ हजार ६२१ झाला आहे. देशा आतापर्यंत ८८ लाख ८९ हजार ५८५ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवलं आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा ९३.९४ एवढा झाला आहे. तर मृत्यूदर हा १.४५ टक्के आहे.