तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:20 IST2026-05-07T15:19:38+5:302026-05-07T15:20:55+5:30
शपथविधीनंतर विधानसभेत आपण सहजपणे बहुमत सिद्ध करू, असा विश्वास विजय यांनी राज्यपालांना दिल्याचे समजते.

तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
तमिळनाडूतील नवीन सरकार स्थापनेचा पेच आता संपुष्टात आला आहे. 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) चे प्रमुख विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विजय यांनी गुरुवारी (७ मे) राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची पुन्हा भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. शपथविधीनंतर विधानसभेत आपण सहजपणे बहुमत सिद्ध करू, असा विश्वास विजय यांनी राज्यपालांना दिल्याचे समजते.
सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचं निमंत्रण -
आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, विजय यांनी राज्यपालांना त्यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या आणि आमदारांच्या पाठिंब्यासंदर्भात संविस्तर माहिती दिली. तसेच, स्थीर सरकार स्थापन करण्याचा विश्वासही दर्शवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल अर्लेकर यांनी विजय यांच्या दाव्यांवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिकपणे आमंत्रितही केले आहे.
केव्हा होणार शपथविधी? -
राज्यपालांच्या संमतीनंतर, आता या नव्या 'विजय सरकार'च्या शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. हा शपथविधी चेन्नईमध्ये पार पडेल. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा शुक्रवारी अथवा शनिवारी आयोजित करण्यात येऊ शकतो. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी टीव्हीकेचे वरिष्ठ नेते, मित्रपक्षांचे प्रतिनिधी आणि देशभरातील अनेक दिग्गज राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शपथविधीनंतर, तमिळनाडूमध्ये नवी विजय सरकारच्या पर्वाला सुरुवात होईल.