कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 09:15 IST2026-05-12T09:12:36+5:302026-05-12T09:15:27+5:30
सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण, हा अमृतमहोत्सव भूतकाळाचे स्मरण नसून भारताला पुढील हजार वर्षे प्रेरणा देणारा उत्सव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
सोमनाथ : जगातील कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही तसेच कोणीही या देशावर दबाव आणू शकणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. १९९८मध्ये भारताने पोखरण अणुचाचण्या केल्या होत्या. त्याचा उल्लेख करून मोदी यांनी हे वक्तव्य केले. पुनर्स्थापित केलेल्या सोमनाथ मंदिराचे उद्घाटन झाले त्या घटनेला ७५ वर्षे झाल्यानिमित्त आयोजिलेल्या समारंभात ते भाषण
करत होते.
ते म्हणाले की, 'देशातील काही शक्ती अजूनही राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा तुष्टीकरणाच्या राजकारणाला प्राधान्य देतात. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाविरोधातही अशीच मानसिकता दिसून आली होती. भारताला १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण १९५१ मधील सोमनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशासाठी खूप महत्त्वाचा होता.'
'या घटनेचा अमृतमहोत्सव हा केवळ भूतकाळाचा स्मरणोत्सव नसून, पुढील हजार वर्षांसाठी भारताला प्रेरणा देणारा उत्सव आहे. ११ मे हा दिवस महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी केवळ सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठाच झाली नाही, तर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९९८ मध्ये अणुचाचण्या देखील केल्या. या चाचण्यांद्वारे आपल्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगाला भारताची क्षमता आणि सामर्थ्य दाखवून दिले, असेही ते म्हणाले.
पुनर्स्थापित सोमनाथ मंदिराच्या अमृतमहोत्सवानिमित्त मोदी यांनी विशेष टपाल तिकीटही जारी केले.
मोदींनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाउंटवरही भारताचे वैज्ञानिक नैपुण्य आणि दृढ निश्चयाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढले.
‘भारताला एकाकी पाडण्याचा प्रयत्न’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारताने १९९८ साली अणुचाचण्या केल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आणि अनेक देशांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
अणुचाचण्यांनंतर जागतिक शक्तींनी निर्बंध आणि आर्थिक दबावाद्वारे भारताला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारत कोणत्याही दबावाला झुकला नाही तर ठामपणे उभा राहिला.
मोदींनी तंत्रज्ञान हे आत्मनिर्भर भारत घडवण्यातील एक मुख्य आधारस्तंभ बनले असल्याचेही नमूद केले. हा दिवस त्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देतो, असे ते म्हणाले.
‘उद्ध्वस्त केलेले सोमनाथ मंदिर पुन्हा उभे राहिले’
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, आक्रमकांनी सोमनाथ मंदिराचे वैभव नष्ट करण्याचा प्रयत्न केला; हे मंदिर पुन्हापुन्हा उद्ध्वस्त केले तरी ते वारंवार पुन्हा बांधण्यात आले.
जगभरात अशी असंख्य उदाहरणे आहेत जिथे परकीय आक्रमकांनी एखाद्या राष्ट्रासाठी महत्त्वाची स्थळे उद्ध्वस्त केली. मात्र, जेव्हा लोकांना संधी मिळाली, तेव्हा त्यांनी तो वास्तूवारसा पुन्हा उभा केला आणि आपला सन्मान जपला.
तडजोड करणारे केंद्र सरकार देश चालवू शकत नाही : राहुल गांधी
नवी दिल्ली : तडजोडी करणारे केंद्र सरकार आता देश चालवण्यास सक्षम नाही अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केली.
पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी नागरिकांनी काही गोष्टी अमलात आणण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने म्हटले आहे की, 'आपल्या १२ वर्षांच्या अपयशाचे ओझे सरकारने भारतीय जनतेच्या खांद्यावर ठेवू नये.'
सोने खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका, पेट्रोल कमी वापरा, खत आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि घरून काम करा असे आवाहन मोदी यांनी रविवारी देशातील जनतेला केले होते.
त्याबद्दल राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, 'केंद्र सरकारने केलेले आवाहन हा सल्ला नाही तर ते सरकारचे अपयश आहे. आता जनतेला काय खरेदी करायचे आणि काय नाही, कुठे जायचे आणि कुठे नाही, हे आता केंद्र सरकार सांगत आहे.'
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी लोक संकटांच्या ओझ्याखाली दबलेले असताना पंतप्रधान देशाला बचतीचे धडे देण्यात व्यस्त आहेत, असा टोला दिला.