लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या आग्नेय भागात, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य व आग्नेय भागात तसेच अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अंदमान बेटांच्या श्रीविजय पुरमसह काही भागांमध्ये दाखल झाला आहे अशी माहिती भारतीय हवामान खात्याने शनिवारी दिली.
पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. या कालावधीत अंदमान बेटे, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागांतही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे निर्माण झालेली स्थिती हे एक कारण त्यामागे असू शकते असे हवामान खात्याने या आधी म्हटले होते.
महाराष्ट्रात कधी एन्ट्री?
मान्सून २६ मे ते ३१ मे दरम्यान केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यावर एका आठवड्यात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचतो. त्यामुळे ६ जूनच्या आसपास तो कोकणात पोहोचू शकतो. त्यानंतर तो उर्वरित महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रात उकाडा आणि उष्णतेची लाट असली, तरी हवामानातील पोषक बदलांमुळे मान्सून वेळेआधीच किंवा वेळेवर महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.
विदर्भ होरपळला! अमरावती, वर्धा देशात हॉटस्पॉट; पारा ४६ अंशांवर
नागपूर : विदर्भात उष्णतेचा कहर तीव्र होत आहे. शनिवारी अमरावती व वर्धा जिल्ह्यांनी देशातील ‘हॉटस्पॉट’ची नोंद केली. या दोन्ही जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअस इतके असल्याने नागरिक होरपळून निघाले. अकोला येथे ४५.४ तर यवतमाळ व ब्रह्मपुरीत ४५.२ अंश तापमान होते.
नागपुरात कमाल तापमान ४३.८ अंशांवर पोहोचले, जे सरासरीपेक्षा ०.३ अंशांनी अधिक होते. विदर्भातील अकराही जिल्ह्यात ४० अंशांवर तापमान होते. पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Web Summary : Monsoon entered Andaman and Nicobar Islands. Expected to reach Kerala by late May and Maharashtra around June 6th. Despite heatwaves in Vidarbha, monsoon arrival in Maharashtra is anticipated on time. Amravati and Wardha recorded scorching temperatures.
Web Summary : मानसून अंडमान और निकोबार द्वीप समूह में पहुंचा। केरल में मई के अंत तक और महाराष्ट्र में 6 जून के आसपास पहुंचने की उम्मीद है। विदर्भ में लू चलने के बावजूद, महाराष्ट्र में मानसून समय पर आने की संभावना है। अमरावती और वर्धा में भीषण गर्मी दर्ज की गई।