आईच्या कुशीतून २० दिवसांच्या बाळाला माकडाने पळवलं, विहिरीत फेकलं; 'असा' झाला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 13:53 IST2026-01-25T13:52:48+5:302026-01-25T13:53:48+5:30
एका माकडाने आईच्या कुशीतून अवघ्या २० दिवसांच्या चिमुकलीला हिसकावून नेलं आणि जवळच असलेल्या एका विहिरीत फेकून दिलं.

आईच्या कुशीतून २० दिवसांच्या बाळाला माकडाने पळवलं, विहिरीत फेकलं; 'असा' झाला चमत्कार
छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका माकडाने आईच्या कुशीतून अवघ्या २० दिवसांच्या चिमुकलीला हिसकावून नेलं आणि जवळच असलेल्या एका विहिरीत फेकून दिलं. मात्र नशिबाने वेळीच साथ दिली. मुलीला 'डायपर' घातलं होतं, जे पाण्यात तिच्यासाठी 'लाईफ जॅकेट' ठरलं. ग्रामस्थांची तत्परता आणि गावात उपस्थित असलेल्या एका नर्सच्या त्वरित मदतीमुळे या निष्पाप मुलीचा जीव वाचला.
नैला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिवनी गावातील ही घटना आहे. गावातील रहिवासी अरविंद राठोड यांची पत्नी आपल्या २० दिवसांच्या मुलीला कुशीत घेऊन जेवत होती. याच दरम्यान अचानक एक माकड आलं आणि आईच्या कुशीतून मुलीला हिसकावून पळून गेलं. आईचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक आणि ग्रामस्थ माकडाच्या मागे धावले. सुमारे १० ते १५ मिनिटं माकड मुलीला घेऊन इकडे-तिकडे धावत होते. त्यानंतर मुलगी कोठेच दिसली नाही, ज्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
डायपरमुळे वाचला जीव
शोध घेत असताना ग्रामस्थांची नजर जवळच्या एका विहिरीवर पडली, जिथे मुलगी पाण्याच्या वर तरंगताना दिसली. असं सांगितलं जातं की, मुलगी सुमारे १० मिनिटं विहिरीच्या पाण्यात होती, परंतु डायपरमुळे ती पूर्णपणे बुडली नाही. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी तातडीने बादलीच्या साहाय्याने मुलीला विहिरीतून बाहेर काढले.
नर्स ठरली देवदूत
नर्स राजेश्वरी राठोडने वेळ न घालवता मुलीला तातडीने सीपीआर (CPR) देण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच मुलीचा श्वास परतला. हे दृश्य पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थांचे डोळे पाणावले. प्राथमिक उपचारानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी मुलीची प्रकृती आता स्थिर असून तिला कोणताही धोका नाही असं सांगितलं.
"लहान मुलांना कधीही एकटं सोडू नका"
मुलीचे वडील अरविंद राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मडवा पॉवर प्लांटमध्ये काम करतात आणि घटनेच्या वेळी ड्युटीवर होते. गावात माकड वारंवार दिसतात, पण अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती. जर गावकरी आणि नर्सची मदत मिळाली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता. आम्ही देव आणि सर्व मदत करणाऱ्या लोकांचे ऋणी आहोत. त्यांनी सर्वांना आवाहन केलं आहे की, लहान मुलांना कधीही एकटं किंवा असुरक्षित ठिकाणी सोडू नका.