"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:15 IST2026-05-19T12:12:43+5:302026-05-19T12:15:29+5:30
...अशा घटना पुन्हा घडल्या, तर "माझ्या एवढे कुणीही वाईट नसेल," असा थेट इशारा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी गुंडगिरी करणाऱ्यांना अथवा उपद्रवी घटकां दिला आहे.

"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
पोलिसांवर होणारे हल्ले आणि तोडफोडीच्या घटना कुठल्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत. संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अशा घटना पुन्हा घडल्या, तर "माझ्या एवढे कुणीही वाईट नसेल," असा थेट इशारा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी गुंडगिरी करणाऱ्यांना अथवा उपद्रवी घटकां दिला आहे.
बंगाल सरकारने सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणावर बंदी घातली होती. यानंतर सर्कस पार्क भागात जेव्हा अतिक्रमणाविरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली, तेव्हा स्थानिक लोकांनी दगडफेक करायला सुरुवात केली. या घटनेत काही अधिकारी जखमी झाले. याशिवाय काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. यासंदर्भात बोलताना, जम्मू-काश्मीरची संस्कृती पश्चिम बंगालमध्ये चालू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.
८ जखमी, ४० जणांना अटक -
सुवेंदू अधिकारी म्हणाले, या हिंसाचारात ६ पोलीस कर्मचारी तसेच २ सीआरपीएफचे (CRPF) जवान जखमी झाले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ४० जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या तपासावर थेट पोलीस आयुक्तांचे लक्ष आहे. अशा प्रकारची गुंडगिरी, राष्ट्रविरोधी, समाजविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
"AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही" -
महत्वाचे म्हणजे, जमावाने चिथावणीखोर कृत्य करूनही पोलीस आणि केंद्रातील जवानांनी सय्यम बाळगल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, तृणमूल काळातील प्रशासन व्यवस्थेवर निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणाले, पोलीस जखमी व्हायचे आणि मंत्री वातानुकूलित (AC) खोलीत बसून राहायचे, ते दिवस आता गेले. जुनेच नियम अजूनही लागू आहेत असे समजू नका. जर कोणाला वाटत असेल की पोलीस हात-पाय बांधून काम करत राहतील, तर ते चुकीचे आहे. मी एसीमध्ये बसून तमाशा पाहू शकत नाही," असा स्पष्ट इशाराही यावेली अधिकारी यांनी दिला.
राजकीय आणि धार्मिक संघटनांच्या कार्यक्रमांसंदर्भात बोलताना सुवेंदू म्हणाले, पोलिसांना पूर्वकल्पना देऊन कार्यक्रम करू शकतात. मात्र गर्दी जमवणे, धार्मिक घोषणाबाजी करणे आणि दगडफेक करणे सुरू राहू शकत नाही. श्रीनगर आणि काश्मीरमध्ये पोलिसांवर होणारी दगडफेक जशी आता बंद झाली आहे, तशीच ती कोलकाता आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्येही पूर्णपणे बंद करण्याची वेळ आली आहे, असेही अधिकारी यांनी म्हटले आहे.