नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये आज झालेली बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगितले. मात्र शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारसोबत ३ डिसेंबर रोजी चर्चेची पुढची फेरी होणार असल्याचे सांगितले.
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषि कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बरेच दिवस तिढा कायम राहिल्यानंतर आज शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार चर्चेसाठी समोरासमोर आले. दिल्लीतील विज्ञान भवन येथे आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमधील ही बैठक सुमारे चार तास चालली. मात्र त्यातून कुठलाही समाधानकारक तोडगा निघाला नाही. आता ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळातील सदस्य चंदा सिंह यांनी सांगितले की, कृषी कायद्याविरोधात आमचे आंदोलन सुरू राहील. आम्ही केंद्र सरकारकडून काही ना काही परत घेऊन जाणारच. मग ती गोळी असेल किंवा अन्य काही. आम्ही पुन्हा एकदा चर्चेसाठी जाणार आहोत.
तर बैठकीनंतर रुलदू सिंह मनसा यांनी सांगितले की, आम्ही मोठ्या समितीची मागणी करत आहोत. मात्र सरकार छोटी समिती बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीच काही निर्णय होऊ शकला नाही. आता पुन्हा तीन तारखेला बैठक होणार आहे. ऑल इंडिया किसान फेडरेशनचे अध्यक्ष, प्रेमसिंह भंगू यांनी सांगितले की, कृषिमंत्र्यांसोबतची आजची बैठक चांगली झाली. त्यात काही प्रमाणात प्रगतीही झाली. आता सरकारसोबत ३ डिसेंबर रोजी आमची पुढची बैठक होईल तेव्हा आम्ही सरकारवर दबाव बनवणार आहोत. तसेच कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यां हितासाठी कुठलीही तरतूद नसल्याचे सांगणार आहोत. सध्या आमचे आंदोलन सुरू राहील.
आजच्या बैठकीबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, आज शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेली बैठक चांगली राहिली. आता आम्ही तीन डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. आम्ही छोटी समिती बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र शेतकरी सर्वांसोबत चर्चा व्हावी यासाठी आग्रही आहेत. आम्हाला त्याबाबत काही अडचण नाही आहे. आम्ही शेतकऱ्यांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे.